‘महाराजांचा अपमान करण्यासाठी सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे’, राऊतांचा घणाघात

112

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता राज्य सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

त्यामुळे आता विरोधकांनी भाजप आणि राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघात करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन आता सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराजांचा अपमान करण्यासाठी सरकारमध्ये स्पर्धा

देशात कुख्यात असलेले राज्यातील खोके सरकारचे मंत्री आणि राज्यपालांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा कोण जास्तीत जास्त अपमान करू शकतं, यासाठीची ही स्पर्धा आहे. त्यातच आता लोढा यांनी देखील उडी घेतली आहे. पण अशी स्पर्धा जर होत असेल तर त्यांना महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न

मंगल प्रभात लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आहेत. निदान राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना तरी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्यांनी उभारलेले किल्ले पहायला जगभरातून पर्यटक महाराष्ट्रात येतात. अशावेळी राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराजांची तुलना एका पक्षाशी बेईमानी करणा-या लोकांसोबत केली आहे. त्यामुळे एकप्रकारे महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्राकडून बक्षीस मिळते का?

त्यामुळे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. या सरकारमध्ये महाराजांचा अपमान करण्यासाठी केंद्र सरकारकडून कौन बनेगा करोडपती प्रमाणे बक्षीस देण्यात येत आहे का, असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.