शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’, मग दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे कसे? राऊतांचा सवाल

133

पैशांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असे असते तर चित्र वेगळे असते. कितीतरी फाटक्या शिवसैनिकांनी अनेक धनिकांना हरवले आहे, मातीला मिळवले आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि नाराज आमदारांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत, त्यांचे हायकमांड तिकडे आहे, असे सांगत शिवसेना लाल किल्ल्याला सलाम करत नाही, तर रायगडला सलाम करते, असे राऊत म्हणाले. तसेच, शिवसेनेचे हायकमांड मातोश्रीवर असताना, दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे कसे असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत नाशिकमध्ये बोलत होते.

बाण तयार ठेवा

बेईमान आमदार आणि खासदार आले आणि गेले तरी शिवसैनिक राहणार आहेत. या शिवसैनिकांमुळेच आमदार आणि खासदार होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. धनुष्य बाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आधी ह्रदयातला प्राण जाईल मग धनुष्य बाण जाईल, असे राऊत म्हणाले. धनुष्य बाण आपल्या हातात ठेवा. जर कुणी खेचायचा प्रयत्न केला तर बाण कुठे घुसवायचा याचे आदेश योग्य वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

( हेही वाचा: पुन्हा राजकीय भूकंप? शिवसेनेचे १० खासदार शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत )

शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही 

नाराज आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उभारला गेलेला आहे. अगदी सामान्यातील सामान्यांना देखील या पक्षामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण काहींना याचा विसर पडला. सर्वसामान्य जनता मात्र आजही पक्षाच्या पाठिशी ठाम आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आज प्रतिकूल परिस्थिती आहे पण अशी भूमिका घेणा-यांना शिवसैनिकांची हाय लागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.