“पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो…” संजय राऊतांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

159

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे. हे पत्राद्वारे राऊतांनी सरकारला काही सवाल केले आहे. या पत्रात भाजप आमदार राहुल कुल, दादा भुसे व किरीट सोमय्या यांचा उल्लेख सुद्धा करण्यात आला आहे. आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्यांवर कारवाई करावी म्हणून मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात असा आरोपही राऊतांनी या पत्राद्वारे केला आहे.

( हेही वाचा : राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट? दिल्लीत जोरदार पावसाला सुरुवात, अलर्ट जारी)

पत्राद्वारे काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, “आपण म्हणता मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार! देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय?” असा सवाल करत राऊतांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

पुढे ते लिहितात, “भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटीचे मनीलॉडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो” अशी विनंती राऊतांनी फडणवीसांना केली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (मालेगाव) यांनी गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. याची माहिती घेण्यासाठी मला आपली भेट घ्यायची आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

पत्रामध्ये सर्वात शेवटी भाजपच्या किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचा हिशोब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे. वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी” अशी विनंती करत राऊतांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1643084297396686851

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.