शरद पवारांची कोलांटउडी! आधी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक नंतर टीका

142

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी कधी कोणते वाक्य बोलायचे आणि वादंग माजवून टाकायचा यामध्ये शरद पवारांचा कुणी हात धरू शकत नाही. एखाद्या विषयावर एक भूमिका घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याच विषयाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी प्रसंगी आपल्याच भूमिकेच्या विरोधात भूमिका मांडून पवार परिस्थितीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतात, त्यातलाच एक विषय म्हणजे शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे हे आहेत. शिवशाहीर पुरंदरे यांचे एकेकाळी लेखी पत्रातून तोंडभरून कौतुक करणारे शरद पवार यांच्यासाठी शिवशाहीर पुरंदरे आता नकोसे झाले आहेत.

१९७४ साली पवारांकडून कौतुकाचा वर्षाव 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बनवलेल्या शिवसृष्टीला शरद पवारांनी १९७४ साली भेट दिली होती. शिवसृष्टी पाहिल्यावर पवारांनी लेखी स्वरूपात त्यांचा अभिप्राय लिहिला, त्यामध्ये त्यांनी शिवशाहिरांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी लिहिताना शरद पवार म्हणाले, ‘श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महाराजांच्या बद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहिरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जीवंत वाटते. राज्याभिषेकाचे दृश्य अतिशय प्रेरणादायी व उत्कृष्ट आहे. यानिमित्ताने प्रखर राष्ट्रभक्ती. अपार मातृप्रेम, स्वच्छ चरित्र या महाराजांच्या खास गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा यानिमित्ताने करूया. शिवशाहिरांच्या प्रयत्नांस संपूर्ण सदिच्छा!’, असे शरद पवार म्हणाले होते.

sharad pawar 2

(हेही वाचा मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडण्यामागे काय आहेत कारणे आणि कोण आहेत जबाबदार?)

२०२२ साली शरद पवारांकडून टीका? 

श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या प्रकाशनाच्या वेळी बोलताना शरद पवार यांनी १९७४ साली शिवशाहीर पुरंदरे यांच्याविषयी मांडलेली भूमिका बदलली. शरद पवार म्हणाले की, ‘रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. पण बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवाजी महाराजांवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या इतिहासकारांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला.’

१९९३च्या बॉम्बस्फोटांतील १३व्या स्फोटाबद्दल संभ्रम 

१९९३मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यावेळी सर्व १२ बॉम्बस्फोट हे हिंदू बहुल भागात झाले होते. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण होईल म्हणून पवारांनी चक्क १३वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याचे खोटे सांगितले होते. याचा खुलासा स्वतःत शरद पवार यांनी मे २०२२ मध्ये पत्रकार परिषदेत केला. अशा प्रकारे मुसलमानांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून पवारांनी त्या परिस्थितीचाही राजकीय लाभ उठवण्यासाठी खोटे विधान केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.