महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘शिवभोजन’ थाळी योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, शिवभोजन थाळी यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या योजनेतंर्गत गरजूंना १० रुपयांत जेवण मिळत होते. कोरोना काळात शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली होती. आजमितीला राज्यात १ लाख ८८ हजार ४६३ शिवभोजन थाळ्यांची विक्री होते. या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयामुळे शिंदे-फडणवीस सरकारने तिचा सर्वंकष आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता.
शिवभोजन थाळीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान दिले जाते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ही योजना यापुढेही सुरू राहणार असून, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेतील.
Join Our WhatsApp Community