शिवसेनेला ‘पक्ष फुटी’ची भीती? ‘वर्षा’वर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर

89

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवत महाविकास आघाडीला अस्मान दाखवल्यानंतर मध्य रात्री शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेची १२ ते १३ मते फुटल्याची शक्यता असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, तातडीने बोललेल्या या बैठकीत शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांसह मंत्री असलेले आमदारही गैरहजर राहिले होते, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी अनेक आमदारांशी पक्षाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद किंवा नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले होते.

महाविकास आघाडीला पुन्हा धक्का

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले, तर भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. परंतु काँग्रेसचे भाई जगताप हे विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत राज्य सभा सदस्य निवडणुकीप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण चाणक्य असल्याचे दाखवून देत महाविकास आघाडीला पुन्हा धक्का दिला.

शिवसेनेचे १२ ते १३ आमदार फुटले!

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एका उमेदवाराचा पराभव हा शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार फुटल्यानेच झाला असल्याची खात्री पक्षाला पटली आहे. शिवसेनेचे १२ ते १३ आमदार फुटले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांना मतदान केले आणि त्यामुळे भाजपच्या पाचव्या उमेदवाराचा पराभव व्हायला हवा होता, तो न होता याचा फटका काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना बसला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री दोन वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु या बैठकीची माहिती देण्याकरता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काही आमदारांचे फोन बंद असल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – Vidhan Parishad Election 2022 Result: पुन्हा एकदा चमत्कार, मविआला फडणवीसांनी दिला ‘प्रसाद’)

शिवसेनेची धाकधुक अधिक वाढली

यामध्ये मंत्री असलेल्या एका ज्येष्ठ शिवसेना नेत्यासह सुमारे १५ आमदारांचा संपर्क होऊ शकला नव्हता. यामध्ये काही मुंबईतील आमदारांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेची धाकधुक अधिक वाढली आहे. आधी फुटलेली मते आणि त्यात आमदारांचे फोन बंद यामुळे पक्ष फुटीची भीती शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत संपर्क साधूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. बरेच आमदार घरी जावून झोपलेहो होते, त्यांना झोपेतून उठत वर्षा गाठावे लागले होते,अशी माहिती मिळत् आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.