सोमय्यांच्या विरोधात सरनाईकांनी केला १०० कोटींचा दावा

सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.

81

किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात, ठाणे न्यायालयात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा सरनाईक यांनी दाखल केला आहे. रितसर प्रक्रिया करुन हा दावा नुकताच दाखल केला गेला असून, सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.

काय आहे आरोप?

मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करुन युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर केला आहे. त्यांनी तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करत खोटी कागदपत्रे सादर करुन, सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती.

(हेही वाचाः प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )

कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना

मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता व पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करुन शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.

सोमय्यांकडून उत्तर नाही

सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस आमदार सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती व बदनामी केली म्हणून माफी मागा, असेही त्यात म्हटले होते. सरनाईक यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोलल्याप्रमाणे आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे.

(हेही वाचाः संकटात महाविकास पाठीशी राहिली नाही! सरनाईकांनी ‘त्या’ पत्रामागील मांडली व्यथा)

काय म्हणाले सरनाईक?

सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करुन त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरू केली. सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यांत वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. ही खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला, माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे, त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.