लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; संजय शिरसाटांचा मोठा दावा

113

महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ ही सभा झाली. या सभेच्या पार्श्वभूमीवरून सध्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ‘ही वज्रमूठ कसली होती? ही वज्रमूठ नव्हती. हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले बसले होते, हे सगळे उद्धव ठाकरेंची मज्जा घेण्यासाठी बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. रविवारी वज्रमूठ सभेला नाना पटोले आले नाहीत. एवढे आजारी होते की ते सभेला येऊ शकले नाहीत? आणि सोमवारी ते सुरतच्या न्यायालयात चाललेत.’

पुढे शिरसाट म्हणाले की, ‘या काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाहीये. नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात काही जमत नाही. तसेच बाळासाहेब थोरातांसोबतही पटोलेंच जमत नाही. हे तुम्ही सगळेजण पाहताय. त्यामुळे मला तरी असे वाटतेय, अनेक दिवसांपासून ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जातील. हा एवढा मोठा नेता, त्या नेत्याला तिथे वागणूक बरोबर मिळत नाही, असे एकंदरीत दिसतेय. म्हणून ते निश्चितच भाजपमध्ये जातील, असे माझे मत आहे. सध्या याबाबत प्रयत्न सुरू आहेत’

‘बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत, कारण विखे पाटलांसोबत जे काही त्यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. जर विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले तर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जातील, असे एकंदरीत त्यांचे उलटपालट गणित असल्यामुळे त्यांच्याबद्दल साशंकता आहे. पण अशोक चव्हाणांची मानसिकता झाली असावी. ते निश्चित भाजपमध्ये प्रवेश करतील,’ असे शिरसाट यांनी सांगितले.

(हेही वाचा – गडाखांना किती खोके घेऊन मंत्री बनवले होते? संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.