“महाराष्ट्रात राहायचंय हे विसरू नका”; मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राऊतांचा इशारा

89

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा किंवा त्यापेक्षा कमी कामगार संख्या असलेली दुकाने, आस्थापनांना आपल्या पाट्या मराठी भाषेतून लावाव्या लागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान व्यापार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचे त्यांचे मत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापारांना इशाराच दिला आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या सरळ करू असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

विरोध करत असतील तर त्यांना सरळ विरोध करू द्या. विरोध करतो म्हणजे काय… राज्याने हा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. प्रत्येक राज्याचा, त्या त्या भाषेचा तो अधिकार आहे. त्यामुळे विरोध कसला करताय? तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचंय हे विसरू नका. तुम्हाला इथेच राहून व्यापार करायचा आहे. उद्योगधंदा करायचा आहे. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही म्हणजे काय… त्यांना ते करावंच लागेल. कारण हा कोणताही राजकीय निर्णय किंवा राजकीय भांडण नाहीये, असे म्हणत संजय राऊत यांनी मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या दुकानदार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना खडेबोल सुनावले आहे.

(हेही वाचा -अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)

मनसेचे काय होते आंदोलन?

मनसे गेली कित्येक वर्ष दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात ही मागणी करत मनसेनं आंदोलन केलं होतं. मात्र पालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारने हा नियम केला असल्याची टीका मनसेकडून करण्यात येत असल्याचे दिसतेय. मराठी ही राज्य भाषा असल्याने राज्यात दुकानांवर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका जाहीर सभेत घेतली होती. त्यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले होते. त्यासाठी अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मनसेस्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दुकानदारांना दिला होता. त्या अल्टिमेटमनंतर मुंबईसह, पुणे, नाशिक येथे मनसे कार्यकर्त्यांनी काही दुकानांची तोडफोड केली, त्यावर मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.