
-
प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठावर कोकणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावरील प्रेम बेगडी असल्याची खरमरीत टीका केली. कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असून, याचा शिक्कामोर्तब लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतून झाल्याचे त्यांनी नमूद केले.
केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या भल्यासाठी एकही निर्णय घेतला नाही. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने काजू बोर्डाची समिती नेमली होती. मी तेव्हा अर्थराज्यमंत्री म्हणून त्या समितीचा अध्यक्ष होतो. काजू धोरण कोकणचा कायापालट करणारे ठरले असते, पण अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजुरी दिली नाही. यावरून त्यांचे कोकणाबद्दलचे दुर्लक्ष स्पष्ट होते.” त्यांनी “चांदा ते बांदा” योजना पुन्हा सुरू करण्यासाठीही ठाकरे यांनी पुढाकार न घेतल्याचा आरोप केला.
(हेही वाचा – Ministry : मंत्रालयात नवे तंत्रज्ञान, पण सवयी जुन्याच; पासऐवजी कचऱ्याचा मारा!)
केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा केली. “शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी काजू बोर्डाला १५०० कोटींचा निधी दिला. काजू उत्पादकांना पहिल्यांदाच आर्थिक मदत मिळाली. काजू बोंडाशी संबंधित उद्योग यशस्वी झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांना ३००० कोटींचा फायदा होईल. हे ठाकरे यांच्या काळात का झाले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे कोकण किनारपट्टी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिंदे यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिवसेना उबाठावर टीका करताना केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “कोकणात आलेल्या प्रकल्पांना शिवसेना उबाठाने विरोध केला. यामुळे कोकणी तरुणांचे रोजगार बुडाले आणि विकास खुंटला. त्यांचे कोकणावरचे प्रेम बेगडी आहे, फक्त शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी ते कोकणाचा वापर करतात.” कोकणी जनता शिवसेना उबाठाला कधीच साथ देणार नाही, असा दावा त्यांनी केला. या टीकेने शिवसेना आणि शिवसेना उबाठातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याचे दिसून येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community