Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?

187
Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?
Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?
  • सचिन धानजी 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना (Shiv Sena) कुठली असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. एका बाजुला मुख्य नेता असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपलीच शिवसेना बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चालली असल्याचा दावा करत आहेत, तर उबाठा शिवसेनेने, काँग्रेससोबत आघाडी करत हिंदुत्वच सोडल्याची टीका केली जात आहे. दुसरीकडे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचा पक्ष चोरल्याचा आरोप करत आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही, मी सुध्दा एक हिंदु आहे असे सांगत आपलं हिंदुत्व हे लोकांच्या चुली पेटवणारे आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी यापूर्वी जे हिंदुत्व मानले आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता, त्या हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दूर व्हावे लागले.

बाळासाहेबांच्या विचारांनाच तिलांजली

विशेष म्हणजे हा विषय पुन्हा एकदा चर्चेला येण्यामागील कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाच्या सचिवपदी असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची देण्यात आलेली उमेदवारी. मिलिंद नार्वेकर यांनी बारावी जागा आपले कौशल्य पणाला लावून निवडून आणली. नार्वेकर यांनी विधान परिषदेवर निवडून जात आपले अनेक वर्षांचे आमदार होण्याचे स्वप्न साकार केले. परंतु हे जरी असले तरी नार्वेकर यांनी ही इच्छा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असतानाही व्यक्त केली होती आणि उद्धव ठाकरेंकडून विधान परिषदेवर वर्णी लावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच नार्वेकर यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा नार्वेकर यांनी हा प्रयत्न केला होता, तेव्हाही संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनीच खोडा घातला होता. त्यामुळे नार्वेकर यांना उमेदवारी देऊन एकप्रकारे बाळासाहेबांच्या विचारांनाच तिलांजली दिली गेली आहे.

(हेही वाचा – बांगलादेशात हिंसाचार; Mamata Banerjee यांनी बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमध्ये येऊन राहण्याचे दिले आवताण)

सत्तेची लालसा स्वस्थ बसू देईना!

२०१९मध्ये शिवसेना (Shiv Sena) भाजपाने युतीमध्ये निवडणूक लढवलेली असतानाच सत्तेत मोठा वाटा मिळाला नाही म्हणून भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पक्ष चालवताना कधीही तडजोड केली नव्हती. पण उद्धव ठाकरे यांना सत्तेची लालसा काही स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातच मुख्यमंत्री पदाची हाव सुटल्याने त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा पूर्ण विसर पडला. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला हिंदुत्व नावाचीच ऍलर्जी असल्याचा आरोप २०१० मधील आपल्या लेखात केला होता. यावरून बाळासाहेबांचे काँग्रेसविषयी असलेले परखड विचार स्पष्ट होतात. त्याआधी २००४मध्ये एका टिव्हीवरील मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी असेही म्हटले होते की, मी कधीही शिवसेनेची (Shiv Sena) काँग्रेस होऊ देणार नाही. जेव्हा मला वाटेल की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होतेय, तर मी आपले हे दुकान बंद करून टाकेन. शिवसेना निवडणूक लढणार नाही. हिंदुत्वाच्या नावावरच शिवसेनेला (Shiv Sena) एवढा मोठा सन्मान मिळाला आहे. बाळासाहेबांनी अनेकदा नेहरु-गांधी परिवारावर मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा आरोप लावला होता. तर सोनिया गांधी यांच्यावर विदेशीपणाची टिका केली होती.

उद्धव ठाकरे नाचताहेत काँग्रेसच्या तालावर

आम्हाला काँग्रेसकडून काही शिकण्याची गरज नाही, असे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र हे आज काँग्रेसच्या सांगण्याप्रमाणे वागू लागले आहेत, हे जनतेला किती पटले असेल. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचाही बाळासाहेबांनी समाचार घेतला होता. राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की, एनएसजीमध्ये सहभागी असलेले कमांडो हे उत्तर भारतातील होते आणि त्यांनीच मुंबई शहराला वाचवले. त्यावर बाळासाहेबांनी हा मराठा हुतात्म्यांचा अपमान असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आधी इतिहास वाचावा. या देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली होती.

(हेही वाचा – Dr. Neelam Gorhe : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बाळासाहेबांची वैयक्तिक मैत्री असली तरी निवडणुकीत ते कधीही एकत्र आले नाहीत. २००२ मध्ये एका टिव्हीवरील मुलाखतीत बाळासाहेबांनी, शरद पवार यांच्याशी कधीही युती होऊ शकत नाही. शरद पवारांसोबत युती केली आणि मध्यावधी निवडणुका आल्या तर लोक काय म्हणतील, कालपर्यंत एकमेकांना शिव्या देत होते, आता मित्र बनले. त्यामुळे राजकीय पातळीवर शरद पवार हे बाळासाहेबांचे कायमच लक्ष्य राहिले होते. बाळासाहेबांनी २००८मध्ये आपल्या अग्रलेखात असे म्हटले होते की, इस्लामी दहशतवाद वाढत आहे आणि हिंदू दहशतवाद हाच त्यांचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे. भाषिक अडथळ्यांना ओलांडून हिंदुंनी एकत्र येण्याच्या इच्छेचाही पुनरुच्चार त्यांनी केला होता.

बाळासाहेबांना जे अभिप्रेत नव्हते तेच उद्धव ठाकरेंनी केले

शिवसेनेची (Shiv Sena) स्थापना ही मराठी माणसांच्या मुद्द्यावर झाली होती, परंतु पुढे ८०च्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला. भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरुन एकप्रकारे जे बाळासाहेबांना अभिप्रेत नव्हते ते काम उद्धव ठाकरे यांनी केले. काँग्रेससोबत जाणे, हिंदुत्व सोडणे, शरद पवारांना सोबत घेणे, त्यांचेच ऐकणे हेच बाळासाहेबांना नको होते. पण त्याच्या उलट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वागलेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे हे आजही अनेक शिवसैनिकांना रुचलेले नाही. उबाठा शिवसेनेला जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर स्वबळावर निवडणूक लढून आमदार निवडून आणावे लागतील. कारण जरी लोकसभेत त्यांना यश मिळाले असले तरी ते मुस्लिम आणि दलित मतांच्या जोरावर आहे. जे खासदार निवडून आले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावर. स्वत:च्या पक्षाचे योगदान काय असा सवाल केला जात आहे. याला उत्तर देण्यासाठी विधानसभेची निवडणूक या कुबड्यांची मदत न घेता लढवली गेल्यास त्याचा फायदा उबाठा शिवसेनेला होईल. ज्यामुळे भविष्यात त्यांच्या पक्षाचे बाळासाहेबांना अभिप्रेत हिंदुत्व कायम राहिल आणि बाळासाहेबांचा वारसा आपण त्याच पद्धतीने पुढे नेत असल्याने जनताही पाठिशी ठामपणे उभी राहिल. परंतु, मुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्तेशिवाय राहायला आवडेल का हाच मोठा प्रश्न आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.