वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्याप्रकरणी शिवसेनेची न्यायालयात धाव

111

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय बदलले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी करण्यात आलेली वॉर्ड पुनर्रचना बदलल्यामुळे यावरुन विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मुंबई महापालिका पुनर्रचना प्रकरणी शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिसेनेची न्यायालयात धाव

2017 प्रमाणेच मुंबई महापालिका वॉर्ड रचना ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यांमुळे मुंबईतील एकूण वॉर्डची संख्या ही 236 वरुन 227 झाली आहे. या निर्णयाला आता शिवसेनेकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाच वॉर्ड पुनर्रचनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय कसा बदलला, असा आक्षेप घेत शिवसेना न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेची होणार अडचण

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुंबई महापालिका वॉर्डची संख्या 227 वरुन 236 इतकी करण्यात आली होती. पण हा निर्णय आता बदलल्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पक्षातील उठावानंतर शिवसेनेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महापालिकेतील सत्ता टिकवणे महत्वाचे असणार आहे तर भाजपसाठी देखील गेल्या महापालिका निवडणुकीत थोडक्यात हुकलेली सत्ता यावेळी सत्यात आणायची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.