शाळांमधून भगवतगीतेच्या पठनाची भाजपची मागणी सारली बाजूला: समाजवादी पक्षापुढे शिवसेना झुकली!

136

भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे,अशी मागणी भाजपच्या तत्कालिन नगरसेविका योगिता सुनील कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. परंतु याला समाजवादी पक्षाने तीव्र आक्षेप घेत ठरावाची सूचना विचारात घेतली जावू नये अशी तत्कालिन महापौरांकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही ठरावाची सूचनाच पटलावर न घेता एकप्रकारे समाजवादी पक्षाची मागणी मान्य केली. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत राज्यात सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व आता बेगडी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

( हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात करमुक्त नाहीच! अजित पवार म्हणाले… )

भाजपने केली होती मागणी

भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी भाजपा नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौरांकडे केली होती.

शिवसेनची हिंदुत्वाशी तडजोड, भाजपचा आरोप

मात्र, यानंतर आलेल्या ठरावाच्या सूचना मार्च महिन्यांच्या विषय पत्रिकेवर घेण्यात आल्या, परंतु मार्च महिन्याच्या जादा ठरावाच्या सूचना पटलावर घेण्यात आल्या, परंतु यामध्ये १७ फेब्रुवारी रोजी मांडलेली ठरावाची सूचना महापौरांनी पटलावर घेतली नाही. कोळी यांनी ही मागणी केल्यानंतर समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी महापौरांना पत्र लिहून ही ठरावाची सूचना विचारात घेतली जावू नये अशी सूचना केली होती. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांची मागणी मान्य करण्यासाठी ही सूचना पटलावर घेतली नाही की, भाजप नगरसेविकेची मागणी म्हणून विचारात घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या मागणीमुळे महापौरांनी आपली सूचना पटलावर न घेत एकप्रकारे आपले हिंदुत्व गहाण ठेवले की काय असा प्रश्न निर्माण होतो,असे कोळी यांनी म्हटले आहे. राज्यातील सरकार टिकवण्यासाठी शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत असून त्यांचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचाही आरोप कोळी यांनी केला. जर लोकसभेत याबाबतची मागणी मान्य झाली तर राज्यातील सरकार आणि महापालिकेतील तत्कालिन सत्ताधाऱ्यांना या भगवत गीतेचे पठन शाळांमधून करायची इच्छा का नाही असा सवालही त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.