शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण कुठे?

यंदाच्या वर्षीचाही दसरा मेळावा हा कमी उपस्थितीत आणि मर्यादीत स्वरूपात होणार आहे.

81

शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क (सध्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान या नावाने ओळखले जाते) असे समीकरण ठरलेले आहे. परंतु कोरोना काळापासून सभा, संमेलनांवर बंदी आली, त्यामुळे २०२० सालीचा शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील बंदिस्त सभागृहात घेण्यात आला. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे, तरीही यंदाचाही मेळावा बंदिस्त सभागृहातच होणार आहे.

षण्मुखानंद सभागृहात होणार मेळावा! 

यंदाचा दसरा मेळावा कुठे होणार अशी चर्चा नवरात्रोत्सव सुरु होण्याआधीपासून सुरु झाली होती. अखेर दसऱ्याला ५ दिवस उरले असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाले आहे. यंदाच्या वर्षीचाही दसरा मेळावा हा कमी उपस्थितीत आणि मर्यादीत स्वरूपात होणार आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी केवळ ५० टक्के उपस्थितीत असणार आहे. त्यामध्ये सेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा : ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी भाजपाने शिवसेनेला करून दिली ‘ही’ आठवण!)

कोणते मुद्दे असतील उद्धव ठाकरेंच्या भाषणात? 

  • यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यातील पालिकांच्या निवडणुका…नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या पालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा दसरा मेळावा गाजण्याची चिन्हे आहेत. दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करतील.
  • सध्या राज्यात ईडीची कारवाई जोरदार सुरु असून, शिवसेनेचे सर्वाधिक नेते हे ईडीच्या रडारवर आहेत. त्यातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आपल्या भाषणातून हल्ला करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर भाजपा केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर करते यावर देखील मुख्यमंत्री बोट ठेवतील.
  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल झालेल्या कथित क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या सर्व प्रकरणामुळे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असून, रामदास कदम यांच्याावर कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर अनंत गिते यांच्या देखील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली होती. त्यामुळे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री या जुन्या शिवसैनिकांची कानउघडणी करण्याची शक्यता आहे.
  • उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले असून, भाजपावर यावरून विरोधक टिका करत आहेत. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटले असून, ठाकरे सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. येत्या दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरे यावरुन मोदी, योगी तसेच भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.