अनेक वर्षे शिवसेना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेते, तो आमचा अधिकारच! – उद्धव गटाचा उच्च न्यायालयात युक्तीवाद

93

मागील ५६ वर्षांपासूनची शिवसेना आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा अशी परंपरा आहे. मात्र यंदाच्या वर्षी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडली आहे. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहेच, त्यासोबत शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. शिवाजी पार्कात हा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनी महापालिकेत अर्ज केला, मात्र मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून दोन्ही गटाला परवानगी नाकारली. या प्रकरणी उद्धव गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबत शिंदे गटानेही न्यायालयात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी, २३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी उद्धव गटाच्या वतीने वकील आस्पी चिनॉय यांनी युक्तीवाद केला, तर महापालिकेच्या वतीने वकील मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने वकील जनक द्वाकरादास यांनी युक्तिवाद केला.

उद्धव गटाने काय केला युक्तीवाद? 

उद्धव ठाकरे गटाचे वकील आस्पी चिनॉय यांनी यावेळी युक्तीवाद करताना म्हणाले, राज्य सरकारने 2016 मध्ये अध्याधेश काढला आहे. ज्यात राज्य सरकारने आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मेळवा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र महापालिकेने कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणे ही शिवसेनेची परंपरा आहे. जर अचानक कुणी दुसरा तिथे त्याच दिवशी मेळावा घेतो म्हणतोय तर सारी प्रक्रिया थांबवणे अयोग्य आहे. शिवसेना कुणाची? हा मुद्दा वेगळा आहे. त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही. गेली अनेक वर्ष पक्ष तिथे कार्यक्रम घेतो, तर तो त्यांचा अधिकारच आहे. सरवणकर यांनी 30 ऑगस्टला परवानगीसाठी अर्ज केला, तर शिवसेनेने 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केला. अनिल देसाईंचे दोन अर्ज पालिकेकडे आले आहेत. जर पोलीस एका आमदाराला आवरू शकत नाहीत तर मग काय उपयोग? यापूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा असायचा. पण साल 2016 नंतर ते मुद्दे उरले नाहीत. साल 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा आहे, असे वकील चिनॉय म्हणाले. सरवणकरांच्या याचिकेत त्यांनी आम्हाला विरोध करण्याऐवजी स्वत:साठी मागणी केली आहे,  हे कसे होऊ शकते?, या अर्जातच विसंगती आहे. त्यांचा दावा आहे की, ही खरी शिवसेना नाही, एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना आहे. केवळ एक व्यक्ती विरोध करतो म्हणून परवानगी नाकारणे योग्य नाही, असे ठाकरेंचे वकील म्हणाले. या याचिकेतून किंवा या मेळाव्यातून शिवसेना कुणाची? हे सिद्ध होणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे हस्तक्षेप याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

(हेही वाचा PFI विरोधातील कारवाईला हिंसक वळण; वाहनांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.