आदित्य म्हणतात, ‘त्यांना’ विधान भवनाची पायरी चढू देणार नाही!

88
शिवसेनेचा दुसरा गट होऊच शकत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. जे फुटीरतावादी आहेत ते अपात्र ठरणारच आहेत आणि अजून एक आव्हान देतो, त्यांनी निवडणूक लढवावी त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दादरच्या शिवसेना मेळाव्यात दिले.
दादर- माहीमचे आमदार सदा सरवणकर हे बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर येथील शिवसैनिकांचा मेळावा माहीम शिवसेना शाखेच्यावतीने आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी दादर कोणाचं?….शिवसेनेचं, वातावरण कोणाचं?…शिवसेनेचं असा आवाज दिला. मी ज्या ज्या ठिकाणी जात आहे तिथे मला सांगताहेत, या गद्दारांना माफी नाही. एकदा गद्दारी केली तर माफ केलं, दुसऱ्यांदा गद्दारी केली त्यांचं काय? असा सवाल करत सदा सरवणकर यांचा समाचार घेतला. त्यांना आपलं समजलो, घरचं समजलो पण असं असूनदेखील धोका देतात तेव्हा वाईट वाटतं, राग आहे.  पण आता हाच राग वगैरे घेऊन पुढे जायचं आहे.
बंड केलं असं म्हणणार नाही, कारण बंड करायला हिंमत लागते. त्यामुळे त्यांनी बंड केलं असं म्हणणार नाही. बंड करायला सुरतेला गेले. त्यानंतर गुवाहाटीला गेले. कारण सुरतवरून आपले दोन सैनिक मागे आले. त्यामुळे त्यांना भीती वाटली की शिवसैनिक शिवाजी महाराज यांच्यासारखे सुरतेला येतील म्हणून गुवाहाटीला पळाले. कोणताही मुख्यमंत्री नगर विकास खातं आपल्याकडे ठेवतो, पण साहेबांनी त्यांना हे खातं दिलं. जे पैसे मिळालेत घरी गेलेत. ते पापाचे आहेत. तत्कालीन आमदार…आता अपात्र होणार म्हणजे होणारच, असाही इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.