शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत हल्लाबोल केला. खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून थेट ठाकरे सरकारला लक्ष्य केले. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यासाठी 50 टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. त्यांच्याविरोधात 20 प्रस्ताव दिले. त्यातील 20 पैकी 11 मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसांत त्यांना अपात्र केले पाहिजे. पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केले जात नाही. 11 मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले आहे. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का?, असा सवाल शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी केला.
…तर न्यायालयात जाणार!
खेडेकरांवर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. उलट त्यांना पोलिस बंदोबस्त दिला जातो. दोन पोलिस त्यांना दिले आहेत. का दिले संरक्षण? शक्य असेल तर त्याची चौकशी करा, असे सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचे काय झाले हे नगरविकास खात्याने सांगावे, असेही ते म्हणाले. नगरविकास खात्यावर कुणाकडून दबाव आल?, कोणत्या नेत्याकडून दबाव आला?, हे मला माहीत आहे, असे सांगतानाच त्यांना निलंबित करा नाही तर नाईलाजाने मी न्यायालयात जाईन, असा इशाराही कदम यांनी दिला. भ्रष्ट माणसाला सरकार पाठिशी घालत असेल तर पुरवणी मागण्यांना पाठिंबा का द्यायचा?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
(हेही वाचा धाडसत्र सुरूच! तुकाराम सुपेंकडे आणखी 58 लाखांचं सापडलं घबाड)
बौद्धवाडीचा निधी पुलासाठी वापरला
मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर राष्ट्रवादीसोबत असतात. खेडमध्ये भडगाव आहे. तिथे बौद्धवाडी असल्याचे दाखवून समाजकल्याणचा 20 लाखांचा निधी आणून नाल्यावर पूल बांधला. बौद्धवाडीच्या नावाने खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा पूल बांधला. त्या इमारतीत त्याच्या पत्नीच्या नावाने वैभवी वैभव खेडेकर या नावाने चार फ्लॅट आहेत. शासनाची फसवणूक करून 20 लाख वापरल्याचं सांगून या प्रकरणी कारवाई करा असं जिल्हाधिकाऱ्याने म्हटलं. एक महिना झाला पण कारवाई झाली नाही, असं ते म्हणाले
Join Our WhatsApp Community