सर्वाधिक वेळा मी निवडून आलो, मला अपेक्षा होती! शिवसेना आमदाराचं मंत्रीपदावरुन वक्तव्य

80

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बड्या आमदारांच्या नेत्यांसह आपला गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. शिवसेनेकडून आता बंडखोर आमदारांविरोधात कारवाई करण्याची भाषा केली जात असतानाच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंत्रीपदावरुन शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. मी सर्वात जास्त शिवसेनेत निवडून आलो होतो मला अपेक्षा होती, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी शिवसेनेवरच हल्लाबोल केला आहे.

अपक्ष आमदारांना मंत्रीपदे का दिली?

बंडखोर शिवसेना आमदारांपैकी काही आमदारांमध्ये मंत्रीपदावरुन नाराजी असल्याचे समोर येत आहे. तीन पक्षांची गोळाबेरीज ही सर्वात जास्त असते. पण शिवसेनेने आपल्या कोट्यातील तीन अपक्ष आमदारांना मंत्रीपदे देण्याची गरज काय होती? कुठे आहेत आता ते आमदार? त्यावेळीही सांगितलं होतं की, सगळ्यात जास्त मी शिवसेनेमध्ये निवडून आलो होतो, मला अपेक्षा होती. जे मला हवं असेल ते मी दुस-याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन बोलायला लावणार नाही, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

(हेही वाचाः शिंदे गटाच्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर)

शिवसेनेने आपल्या हातात केवळ मुख्यमंत्रीपद ठेवलं आणि इतर सर्व महत्वाची खाती सोडून दिली यामुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले आहे.

राऊतांवर निशाणा

संजय राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांना आव्हान करण्यात येत आहे. त्यावरुनही भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांना मी सल्ला देऊ इच्छित नाही. पण ही वेळ आमदारांना आव्हान देण्याची नसून त्यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याची आहे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः शिंदे गटाच्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.