देशात कुणीही सुरक्षित नाही! फोन टॅपिंगवरून संजय राऊतांचा टोला

पश्चिम बंगालमध्ये फोन टॅप केले, तरी तिथे भाजपचा पराभव झालाच, महाराष्ट्रातही आमच्या सारख्या प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केले, तरी आम्ही आमचे सरकार आणलेच, असे संजय राऊत म्हणाले.

61

हे सरकार स्वतःच्या मंत्र्यांची हेरगिरी करत आहे, सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, प्रमुख नेते, पत्रकार अशा सर्वांचे सरकारकडून फोन टॅपिंग केले जात आहे, यावरून या देशात कुणीही सुरक्षित नाही, हेच स्पष्ट होत आहे, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला.

सरकारला खुलासा करावा लागणार!

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच विदेशातील वृत्तपत्रांमध्ये भारतात प्रमुख नेते आणि पत्रकार यांचा फोन टॅप होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे हलकल्लोळ माजला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, पश्चिम बंगालमध्येही फोन टॅप केले तरी तिथे भाजपचा पराभव झालाच, महाराष्ट्रातही आमच्या सारख्या प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केले, तरी आम्ही आमचे सरकार आणलेच, त्यामुळे सरकारच्या अशा कोणत्याही कृत्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचा फोन टॅप झाल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री त्याची चौकशी करणार आहेत. यावर हेच दिसते कि देशात कुणीही सुरक्षित नाही, याचा खुलासा केंद्र सरकारला करावा लागणार आहे, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : विठ्ठला, पंढरपुरात भक्तीसागर पुन्हा भरू दे! मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे)

विरोधकांचा निर्धार!

ज्या लोकांचे फोन टॅप करण्यात आले, त्यात मोठ्या संख्येने पत्रकार आहेत. पत्रकारांचे फोन टॅप करून काय करायचे होते माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला का माहिती नाही. पण महाराष्ट्रातील सरकार बनत असताना अनेक लोकांचे फोन टॅप झाले होते त्याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कोणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, संसदीय मंत्र्यांनी सर्व विषयांवर चर्चा करू, असे म्हटले आहे. अनेकदा सरकार बाहेर एक गोष्ट म्हणते आणि प्रत्यक्ष चर्चेपासून पळ काढते, पण यावेळी मागे हटायचे नाही, असे सर्व विरोधकांनी ठरवले आहे, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.