‘पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करणा-यांनी…’, राऊतांनी मराठा संघटनांना सुनावले

112

शिवसेनेने संभाजीराजेंना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे आता मराठा संघटनांमध्ये शिवसेनेबाबत नाराजी आहे. शिवसेनेने संभाजीराजेंच्या पाठीत खंजीर खपसल्याची टीका मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. या टीकेवर आता शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच संतापले असून, यावरुन त्यांनी मराठा संघटनांना इशारा दिला आहे. खंजीराची भाषा करू नका, आम्ही आमच्या वाटणीची जागा छत्रपतींना देऊ केली होती. अजून काय करायला हवं होतं, असा थेट सवाल राऊतांनी मराठा संघटनांना केला आहे.

(हेही वाचाः राज्यसभेसाठी शिवसेनेचे ठरलेच, ‘संजय आणि संजयच’)

हा छत्रपतींच्या विचारांचा अपमान

आम्ही कुणाच्याही पाठीत कधीही खंजीर खुपसलेला नाही. आम्ही आमच्या वाटणीची जागा छत्रपती संभाजीराजेंना देऊ केली होती. याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात का? अशी विधानं करताना जरा जपून बोलावं, असा इशारा राऊतांनी मराठा संघटनांना दिला आहे. महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर असे चुकीचे आरोप करणे हा छत्रपतींच्या विचारांचा अपमान असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.

पवारांचे घेतले आशिर्वाद

संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत हे गुरुवारी आपला राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे पवारांचा आशिर्वाद घेण्यासाठी आपण आलो असल्याचे राऊतांनी सांगितले. तसेच आम्ही शिवसेनेची एक जागा जी जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, ती जागा छत्रपतींना देण्यास तयार होतो. त्यामुळे आम्ही पाठीत खंजीर खुपसला अशी भाषा कोणीही करू नये, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः शिवसेनेने फिरवली ‘पाठ’, भाजप देणार राजेंना ‘साथ’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.