महापालिका निवडणूक २ वर्षे लांबणीवर टाकण्याचा सेनेचा कट! भाजपचा आरोप 

दोन वर्षे मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलत असाल, तर त्या दोन वर्षांतील सर्व कंत्राटे, ठेके यांच्या मंजुरीचे विषय स्थायी समितीकडे न जाता निवडणूक आयोगाकडे पाठवा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले. .  

83

कोरोनाची तिसरी लाट येते, म्हणून काळजी घेतली पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. तिसऱ्या लाटेत अनेक अडचणी येतील, असा अंंदाज आहे. पण त्याचा फायदा घेत जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदत वाढ देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा सुरू आहे, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. ही भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का, ते त्यांनी स्पष्ट करावे, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. 

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना करीत असलेल्या कटकारस्थानांचा पर्दाफाश केला. यावेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

३० वॉर्ड फोडण्याचे कारस्थान!

मुंबईतील 30 वॉर्ड आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे हे वॉर्ड फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, असेही शेलार म्हणाले. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. भाजपा तयार आहे. असे सांगत ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप है तयार’, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाना साधला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेकडून कटकारस्थान राबवणे सुरु झाले आहे. पराभवाच्या भीतीने शिवसेना हे करत आहे, असे सांगत शिवसेनेवर गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केले. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ज्या घडामोडी सुरु आहेत, त्याकडे आमचे बारीक लक्ष आहे. दीड वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आटोक्यात येते, असे होताच त्यांचा पहिला डाव मुदत पूर्व निवडणूक घेण्याचा विचार झाला होता. पण दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आली आणि यांचा डाव फसला. दुसरा प्रयत्न प्रभाग रचनेत केला. २०१७ मध्ये प्रभात रचना असंविधानिक आहे, अशी चर्चा सुरू केली. भाजपाने आपल्या फायद्यानुसार प्रभाग रचना केली, असे अर्धवट अभ्यासावर शिवसेनेचे म्हणणे आहे, असेही शेलार म्हणाले. 

(हेही वाचा : देवेंद्र फडणवीस नाथा भाऊंच्या घरी, पण नाथा भाऊ मात्र मुंबईत)

…तर २ वर्षे कंत्राट, ठेके निवडणूक आयोगाकडे द्या!

दरम्यान, जर निवडणूक आयोगाला पुढे करुन दोन वर्षे निवडणूका पुढे ढकलत असाल, तर त्या दोन वर्षांतील सर्व कंत्राटे, ठेके यांच्या मंजुरीचे विषय स्थायी समितीकडे न जाता निवडणूक आयोगाकडे पाठवा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 20 हजार कोटींचा असून अशा अनेक प्रकल्पांना मंजूरी देणे बाकी आहे. त्यांच्या ‘कट’ साठी ही कारस्थाने सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गाळ कुठे टाकल्याचा फोटो दाखवा!

यावेळी नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेवर टीका केली. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही, वाद्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवालही त्यांनी केला. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.