शिवसेना म्हणते, ‘मोदी नामा’ची जादू उतरली! सक्षम पर्याय उभा करा!

हिंदुस्थानात मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारतमाता की जय!, हे असले उठवळ प्रचार करणाऱया ‘जत्रा’ मंत्री-संत्री करीत आहेत. या सगळय़ा नौटंकीविरोधात सगळय़ांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

117

२०२४ चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील. 19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाड्यांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये, अशा शब्दांत शिवसेनेने ‘सामना’ च्या अग्रलेखात म्हटले आहे.

जन यात्रेवर टीका! 

विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे. मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले, असेही सेनेने म्हटले आहे.

(हेही वाचा :कोकणात जाणा-यांसाठी राणे सोडणार फुकट ट्रेन)

सक्षम पर्याय द्यावा लागेल!

प. बंगाल व महाराष्ट्रात जे घडले ते विरोधी पक्षाला मार्गदर्शक आहे. भाजपचा पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो हे दोन राज्यांनी दाखवले. त्यासाठी मनात व मनगटात लढण्याची जिगर पाहिजे इतकेच. तामीळनाडूत द्रमुकचे स्टॅलिन जिंकले, केरळात डाव्यांनी विजय मिळविला. आज उत्तर प्रदेश, आसाम सोडले तर कोणत्या राज्यात भाजपचे सरकार आहे? मध्य प्रदेश, कर्नाटकातील सरकारे मोडतोड तांबा-पितळेतून निर्माण केलेली आहेत. बिहारात रडीचा डाव निवडणूक आयोगाच्या मदतीने झाला नसता तर तेजस्वी यादव भारी पडलाच होता. राज्याराज्यांत प्रादेशिक पक्ष जोरात आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेशातील सरकारे ही दिल्लीत ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ या महान विचारांची आहेत, पण एकंदरीत देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल होत आहे. फक्त जनता पक्षाच्या स्थापनेच्या काळात सत्ताधारी पक्षातून एक जगजीवनराम बाहेर पडले व देशाचे चित्र पालटले तसा एक जगजीवन बाबू धाडसाने राष्ट्रहितासाठी उभा राहिला पाहिजे. भविष्यात ते घडेलच घडेल. देशात शेतकऱयांचा प्रश्न उभा ठाकला आहे, महागाई-बेरोजगारी आहे. पेगॅससचे गांभीर्य सरकार समजून घेत नाही, पण कधी तालिबान्यांचे भय निर्माण करायचे तर कधी पाकडय़ांची भीती घालून लोकांची मने तापवून भावनांचे खेळ करायचे. आज तालिबानी अफगाणिस्तानात रक्तपात घडवीत आहेत व इकडे भाजपचे लोक सांगतात, ‘‘हिंदुस्थानात मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारतमाता की जय!’’ हे असले उठवळ प्रचार करणाऱया ‘जत्रा’ मंत्री-संत्री करीत आहेत. या सगळय़ा नौटंकीविरोधात सगळय़ांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र येणे म्हणजे फक्त चर्चांची गुऱहाळे पाडणे नाही. लोकांना पर्याय हवाच आहे. तो देण्याची क्षमता आपल्यात आहे, असा विश्वास समस्त विरोधी पक्षांनी जनतेस द्यावा लागेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.