देश हुकूमशाहीकडे चालला आहे; उद्धव ठाकरेंची टीका!

85

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने षणमुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. गद्दार विकले जाऊ शकतात परंतु ही गर्दी विकत घेता येणार नाही, ही खरी शिवसेना आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे, अशी टीका  उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

( हेही वाचा : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२८ वाहनांचा ताफा; चालकांची भरती करण्याऐवजी खासगी सेवेवर वर्षाला १७ कोटींचा खर्च )

बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यामागील हेतू वाईट

वडील चोरणारी औलाद असं मी दसरा मेळाव्यात म्हणालो होतो स्वत:चे वडील लक्षात ठेवा. महाविकास आघाडीचे सरकार का पडलं कारण आम्ही हिंदुत्व सोडलं असा आरोप करण्यात येत होता परंतु हे स्वत: म्हणाले शरद पवार फार गोड माणूस आहेत मी त्यांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग मी काय घेत होतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. विधानसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे तैलचित्र लावताय याबाबत नक्कीच अभिमान आहे परंतु यामागील तुमचा हेतू आहे तो अतिशय वाईट आहे. वारसा हडपण्याचा हा डाव आहे, मोदी जरी असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मत मिळणार नाही. ‘मोदी के आदमी’ परंतु चेहरा मात्र बाळासाहेबांचा, हिंमत असेल तर मोदींच्या नावे मते मागवून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिले.

तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा फोटो लावून येतो, बघूया महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो. यांच्यात ही हिंमत नाही. माझ्या पक्षप्रमुख पदाची चिंता करू नका, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे तुम्ही सांगाल तेव्हा हे पद सोडेन. असे उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

मुंबईला भिकेला लावण्याचा डाव

आपण जी कामे गेली त्यांचे नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले. या कामांची पायाभरणी आपण केली म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलात. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरात, उत्तरप्रदेश या बाहेरच्या राज्यात जात आहे आणि आमचे मुख्यमंत्री दावोसला जाऊन भाकरवडीचा उद्योग वाढवणार आहेत. महापालिकेतल्या ठेवींमध्ये जनतेचा पैसा आहे, मुंबई महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका आहे, यामुळेच कोस्टल रोडवर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. बॅंकेत पैसा ठेऊन विकास होत नाही असं हे बोलतात तो पैसा जनतेचा आहे, यांना मुंबईला भिकेला लावायचे आहे. ‘बुरी नजर वाले तेरा मुह आम्ही काला करणार’ म्हणजे करणारचं, ही मुंबई लुटू देणार नाही, हे गुलाम मुंबईचा पैसा घेऊन जात आहेत हे कसले बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “कोश्यारींना लवकर शहाणपण सुचलं, महापुरुषांचा अपमान करणारा हा माणूस अशा माणसाला हाकलवून दिलं पाहिजे. शेपट्या गाळून थंड बसणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असून शकत नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.