पंजाब निवडणूक : सिख फॉर जस्टीसचे ठरले पुढील लक्ष्य! 

पंजाबमध्ये २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. त्यामध्ये गुरपतवंत सिंह पन्नू हा आतापासूनच विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे.

91

पंजाब राज्याच्या निवडणुकीला अजून वेळ असला तरी पंजाबातील शिखांमध्ये फुटीरतेची बीजे पेरण्याचे अथक प्रयत्न करणाऱ्या खलिस्तान्यांचे या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचे षडयंत्र आतापासूनच सुरु झाले आहेत.  त्यासाठी सिख फॉर जस्टीसच्या वतीने ‘पंजाब बंद’चे आवाहन केले होते. परंतु ते पूर्णतः असफल ठरले. हीच एसएफजे एका बाजूला पंजाबातील शिखांच्या प्रती खोट्यानाट्या प्रेमाचा उमाळा आणते आणि दुसरीकडे मात्र ज्या अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या दहशतवादामुळे शिखांना देश सोडून जावे लागले, त्यांच्याविषयी मूग गिळून गप्प असते.

पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंह यांची हत्या करणारा खुनी दिलावर सिंह याच्या मृत्यूला २६ वर्षे पूर्ण झाली, त्याच्या समरणार्थ सिख फॉर जस्टीसचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू याचे देशद्रोही कारस्थाने जोरदार सुरु आहेत. यावेळी त्याने अकाल तख्त साहिब येथे प्रार्थनेचे आणि राज्यव्यापी बंदची घोषणा केली. मात्र नेहमी होणारी प्रार्थना यावेळी पार पडली, परंतु पंजाब बंद झालाच नाही.

निवडणुकीसाठी कटकारस्थाने!

पंजाबमध्ये २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. त्यामध्ये गुरपतवंत सिंह पन्नू हा आतापासूनच विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने यासाठी व्हिडिओ, पोस्टर आणि वेबसाईटच्या माध्यमातून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याद्वारे खलिस्तानींवर करण्यात आलेल्या कारवाईला नरसंहार घोषित केले आहे. त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचा कार्यकाळदेखील नरसंहार म्हणून संबोधित केले आहे. तसेच बेअंत सिंह यांचा खुनी दिलावर सिंह याला मात्र शूर ठरवले आहे.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

पन्नू सध्या मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची तुलना बेअंत सिंह यांच्याशी करत आहे. त्याचा दावा आहे की,

१९९५मध्ये दिलावर सिंह याने बॉम्बच्या साहाय्याने बेअंत सिंह यांना रोखले होते
२०२२ यामध्ये एसएफजे मतपेटीच्या माध्यमातून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना रोखेल .

यामागे पाकिस्तानचाच हात! 

सिख फॉर जस्टीस यांच्यासह डझनभर संस्था ज्या पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशांमध्ये बसून भारत विरोधी षडयंत्र रचत आहेत. त्या सर्व भारतातील सुखीसमाधानी शिखांची माथी भडकवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. त्यासाठी किसान युनियनचे आंदोलन असो, शाहीन बागच्या माध्यमातून ‘के२’ (काश्मीर-खलिस्तान) असो अथवा जागतिक स्तरावर शिखांना संभ्रमित करणारा जनमंत संग्रह असो या सर्वांचा वापर शिताफीने करत आहे. परंतु अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या समोर मात्र मूग गिळून गप्प आहेत. जेव्हा भारतीय सैन्याने अफगाणिस्तानातून शिखांना सुरक्षितपणे भारतात आणले, त्यावेळी पवित्र गुरु ग्रंथ साहिब यांना विशेष विमानाने भारत सरकारने अफगाणिस्तानातून आणले. तेव्हाही सिख फॉर जस्टीस गप्प होती. यावरून या संघटनेला पाकिस्तानचीच फूस आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.