- वीरेंद्र ल. देशपांडे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) विविध पैलूने अनेकांना सुपरिचित आहेतच. क्रांतीकारक, समाजसुधारक, हिंदुत्वनिष्ठ, कवी वैगरे, असा एकही विषय नसावा ज्यात सावरकरांची दृष्टी पोहचली नाही. ते भविष्यकारही होते. अर्थात राष्ट्रीयदृष्ट्या. विवाह विषयक त्यांचे विचार यातही उणे पडले नाही. अशा साऱ्या पैलूत अधिक ऐक पैलू पडतोय तो मात्र अनेकांना अपरिचित असावा. तो पैलू म्हणजे पर्यावरण क्षेत्र. या विषयासंबंधी सावरकरांची दखल घेतली गेलेली दिसत नाही. तो पैलू जनमानसासमोर पोहचावा हा उद्देश.
आज पर्यावरणावर चर्चासत्र चालतात, परिसंवाद घेतले जातात. विविध कार्यक्रमातून उपक्रम राबविले जातात. इतकेच काय गणेशोत्सवात, दुर्गा उत्सवात विविध देखावे दाखविले जातात. अनेकांनेक लोक बघतात. रंगवून रंगवून चर्चा करतात नि लगेच विषयाचं विस्मरण होऊन पुढील दैनंदिन कामाला लागतात. कृती मात्र कुणी करताना विशेष दिसत नाही, कुणी एखाद्याने केली तर लागलीच हेटाळणी, टिंगलटवाळी करुन मोकळे होतात. ‘पर्यावरणदिन’ वृत्तपत्राच्या कागदावरच काय तो दिसतो. ‘झाडे जगवा’ संदेश दिला जातो. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ घोषणा दिल्या जातात. घोषणा फलक विद्यार्थी केवळ हातात घेऊन मिरवितात. त्या दिनापुरता तो सोहळा साजरा होतोय खरा; पण प्रत्यक्ष वृक्षारोपण कृती मात्र फारशी दिसून येत नाही. झाडे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. याचे मोल थोड्याफार प्रमाणात आज जाणवू लागले आहे व प्रसार केला जाऊ लागला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे (Veer Savarkar) दूरदृष्टीचे प्रणेते याही विषयात कृतीशील अग्रणी ठरतात. काळाची पाऊले ओळखणारे सावरकर मृत्यूनंतर विद्युत दाहिनीत घाला, असे सांगतात. ‘लाकूड फाटा बचाव’ या धोरणाची शिकवण देतात. वृक्षतोड राष्ट्रीय हानी हे दर्शवतात. हा विचार, हा संदेश मौल्यवान नव्हे काय…? सावरकर प्रचंड विज्ञानवादी !
झाडांवर, फुलांवर, पक्ष्यांवर अलोट प्रेम करणारे वीर सावरकर किती जणांना ज्ञात असावे बरे. स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असलेले सावरकर ‘अनेक फूले फुलती, फुलोनिया सुकूनी जाती’, ‘अमर होती ती वंशलता’ अशा शब्दफुलांनी अनेक काव्यपंक्ती रचतात. देशाच्या स्वातंत्र्याचा विचार जेवढ्या दूरदृष्टीने, दिव्य दृष्टीकोनातून करतात तेवढाच झाडांसंबंधी, फुले व लता संबंधी करताना आढळतात, याची साक्ष आजही त्यांनी (सावरकर) लावलेले निंबोणीचे वृक्ष देत आहे. वीर सावरकरांनी (Veer Savarkar) लावलेले निंबोणीचे वृक्ष सावरकरांचे झाडांवरील असलेले विलक्षण प्रेमाची साक्ष देत तटस्थपणे ७३ वर्षांपासून उभे असून ‘झाडे जगवा’ हा सावरकरी संदेश देत आहे.
(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ गीताला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार)
नाशिक येथे आधाराश्रमाच्या मागील बाजूला ‘तिवारी महल’च्या प्रांगणात वीर सावरकरांनी (Veer Savarkar) निंबोणीचे झाड २६ जुलै १९३७ ला लावले. त्या झाडाचा आज वटवृक्ष झाला आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या विचाराला सावरकरांनी विशेष प्राधान्य देवून बळ दिलेले दिसून येते. स्वातंत्र्यवीर वीर सावरकर साहित्यातून वृक्षवल्लीची केवळ आस्था प्रकट करून न थांबता वृक्षारोपण करून कृतीशील बनले. याचाच हा एक भाग. ‘तिवारी महल’च्या प्रांगणात हा भलामोठा वृक्ष डौलाने डौलत आहे. तिवारी महलचे त्या वेळचे मालक श्री. किसनलाल चक्रपाणी उपाख्य के. सी. तिवारी सावरकरांच्या कार्यावर अत्यंत खुश असून त्यांच्या प्रभावाने सावरकरांचे जीवस्य कंठश्य मित्र बनले. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’च्या पाच संस्थापकांपैकी तिवारी एक होते. अनेकदा सावरकरांचा मुक्काम तिवारींच्या महलमध्ये असायचा. श्री. के. सी. तिवारींच्या घरी मुक्कामी असताना सावरकर (Veer Savarkar) नेहमीच झाडे व त्यांच्या पालन पोषणाविषयी चर्चा करत. त्यातून श्री. तिवारींनाही प्रेरणा मिळाली. तिवारींनी अडीचशे स्क्वेअर मीटरवर वेगवेगळी झाडे लावली. त्यात वड, औदुंबर, फणस, खिरण्या आदी झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. आजही ही सारी झाडे सावरकर आणि तिवारी यांची साक्ष देत आहेत.
सावरकरांनी लावलेला निंबोणी वृक्ष मात्र ‘तिवारी महला’च्या दर्शनी भागात असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या निंबोणी वृक्षावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी २६ जुलै १९३७ रोजी लावलेला वृक्ष असा फलक विशेष आकर्षण निर्माण करतोय. रस्त्याला अडचण होते म्हणून सावरकरांनी लावलेला निंबोणी वृक्ष तोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
हे समजताच वृक्षाचे मालक श्री. योगेश तिवारी नि त्यांचे वृक्षप्रेमी सहकारी सरळ धाव घेत नाशिक न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात गेले. दीड-दोन लाख रुपये खर्च केले. धावपळ केली. त्या कामी चंडालिया, नाझरे, अधिवक्ता भावस्तर नि तिवारी यांनी प्रयत्नपूर्वक लावून वृक्ष वाचविले. हे खरे कौतुकास्पद आहे. त्या मंडळींचे हे खरे सावरकर प्रेम, ही खरी सावरकर भक्ती. ही सारी मंडळी सांगतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आम्हाला दिलेला हा अनमोल ठेवा जपण्यातच आमची खरी सार्थकता आहे. सावरकरांचे वृक्ष – लागवड, वृक्षप्रेमातून आम्हाला मिळलेली प्रेरणा प्रसारीत करण्याचा संकल्प केला आहे. हीच आम्हाकरिता खरी सावरकर स्मृती! कृतीशील प्रेरणा स्फूर्ती देईल, यात संदेह नाही!
(लेखक सावरकरप्रेमी आहेत.)
Join Our WhatsApp Community