केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

98

राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची भूमिका महत्त्वाची असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे व्यक्त केला.

( हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळविस्तार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच )

केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून, त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सदिच्छा भेट

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची ६ए कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची १७ अकबर रोड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.