आता संपूर्ण आरक्षण सोडत की फक्त ओबीसीच?

121

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  ‘ओबीसी’ ला आरक्षण देण्यास आल्याने, मुंबई महापालिकेच्या प्रभागात ओबीसींच्या तीन प्रभागांची भर पडणार आहे. मागील निवडणुकीत २२७ प्रभाग असल्याने ६१ प्रभाग हे ओबीसी करता राखीव होते. परंतु हे प्रभाग २३६ झाल्याने ओबीसींच्या प्रभागांची संख्या ६४ होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग किती प्रभाग राखतात आणि त्यावर पुन्हा नव्याने आरक्षण जाहीर करतात की फक्त नव्याने ओबीसीचे आरक्षण जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण वगळून ३१ मे रोजी २३६ प्रभागांमधून महिलांसाठी ११८ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी -१५ ( महिलांसाठी -८), अनुसूचित जमातीसाठी -२ महिलांसाठी -१) आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आगामी दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून त्या अंतर्गत ‘ओबीसी’च्या ६४ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. त्यात  महिलांसाठी  ५० टक्के प्रभाग असतील, तर उर्वरित निम्मे प्रभाग हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग असतील.
मात्र जर आयोगाने संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचे आदेश दिल्यास त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीची प्रतिक्षा सर्वच राजकीय पक्षांना व इच्छूक उमेदवारांना लागून राहिली आहे. मात्र या ओबीसी आरक्षण सोडतबाबतची तारीख व वेळ याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोग मुंबई महापालिका निवडणूक विभागाला कळवणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

…तर पालिका निवडणूक विभाग कार्यवाही करेल

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ रोजी होणे अपेक्षित होती.  मात्र ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, प्रभाग गाची वाढीव संख्या तसेच इतर कारणांमुळे तत्कालीन ठाकरे सरकारने महापालिकेवर प्रशासक नेमून ही निवडणूक सहा महिने पुढे ढकलली होती. पण आता ठाकरे सरकार जाऊन शिंदे व फडणवीस सरकार राज्यात आले. राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेनेचे दोन गट स्थापन झाले. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यावर काहीच दिवसात ‘ओबीसी’ समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवल्याने निवडणूक प्रक्रियेत आता मोठा बदल झाला आहे. ओबीसी समाजाला मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांमधून ६४ प्रभाग आरक्षित करून मिळणार आहेत. मात्र निवडणूक आयोगाने जर आदेश दिले तर त्यानुसार फक्त ‘ओबीसी’साठी ६४ प्रभाग आरक्षित करून त्यापैकी फक्त महिलांचे प्रभाग निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मात्र जर आयोगाने अनुसूचित जाती, जमाती, महिलांसाठी संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचे आदेश दिल्यास त्यानुसार पालिका निवडणूक विभाग कार्यवाही करणार आहे.
जर संपूर्ण निवडणूक आरक्षण सोडत झाल्यास अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग तसेच ठेवून त्यामधून ८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यासाठी सोडत काढण्यात येईल. तसेच, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग तसेच राहतील मात्र त्यामधून १ प्रभाग महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तसेच, उर्वरीत प्रभागांमधून महिलांसाठी ५० टक्के प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत प्रभागामधून ‘ओबीसी’साठी ६४ प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित प्रभाग हे खुले प्रभाग असतील,अशी माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.