सरकारचा आमदारांवर विश्वास नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी घेण्याचा घाट!

महाविकास आघाडीने जर विधिमंडळ नियम समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असेल. तर तो नियमबाह्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

72

महाराष्ट्राच्या इतिहासात मागील ६१ वर्षांत जे घडले नाही, ते आज घडत आहे, महविकास आघाडीचे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा विचार करत आहे. यावरून स्पष्ट होते कि, या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, हे सरकार घाबरले आहे, त्यांचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, म्हणून ते आवाजी मतदान घेण्याचा घाट घालत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नियमबाह्य पध्दतीने घेतला निर्णय!

खरे तर अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घ्यायची असेल, तर विधिमंडळ नियम समितीच्या बैठकीत नियमात बदल करणे अपेक्षित आहे. ही बैठक अध्यक्षांच्याशिवाय घेता येत नाही. कारण नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना नाही. त्यामुळे आघाडी सरकारने जर विधिमंडळ नियम समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचे आहे. यावरून स्पष्ट होते की, हे सरकार घाबरले आहे. तुमच्याकडे जर बहुमताचा आकडा आहे, तर मग हात वर करायला का लावता? यावरून त्यांना स्वतःच्याच आमदारांवर विश्वास नाही, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी ‘नंबर १’ मॅनेज केला! मनसेचा आरोप)

इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन नौटंकी! 

गुरुवारी, १५ जुलै रोजी काँग्रेसच्या नेत्यांनी इंधन दरवाढीमुळे केंद्राच्या विरोधात हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत सायकल रॅली काढली. त्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले कि, पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करांपैकी ३० रुपये थेट राज्य सरकाराला मिळतात, त्यानंतर केंद्राकडे जाणाऱ्या रकमेतूनही २३ रुपयेदेखील पुन्हा राज्यालाच मिळतात. त्यामुळे इंधनावर दर कमी करणे राज्याला जमू शकते, त्यांनी २ टक्के कर कमी करावा. राज्याला इंधनावरील करापोटी २४ हजार कोटी मिळाले आहेत, म्हणून काँग्रेसचे आंदोलन नौटंकी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.