तर निकाल येईपर्यंत शिंदे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, घटनातज्ज्ञांचे मत

135

शिंदे गटावरील 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. घटनापीठाची निर्मिती करून त्यानंतर यावर निकाल देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शिंदे सरकारवर सध्यातरी कोणतीही गदा येणार नाही.

पण हे घटनापीठ तयार व्हायला वेळ लागला तर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण होईल, असे मत ज्येष्ठ कायदे व घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

घटनापीठाकडे हा प्रश्न पाठवणं योग्यच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाईची टांगती तलवार होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी काही वेळ लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ही सुनावणी पाठवणे हा निर्णय अतिशय योग्यच आहे. पण हे घटनापीठ तयार होऊन त्यावर निकाल द्यायला किती वाळ लागणार हे पाहणं गरजेचं असल्याचे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

तर शिंदे यांचा कार्यकाळ पूर्ण होईल

हे घटनापीठ लवकरात लवकर स्थापन करणं गरजेचं असून ते फार काळापर्यंत प्रलंबित ठेवणं हे योग्य नाही. सीएए कायद्यावरील सुनावणी आजही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तसे झाल्यास आणि दोन वर्षांनी या प्रकरणावर निकाल आल्यास तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण होईल, अशी शक्यता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.