ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला! भाजप-काँग्रेस उतरणार रस्त्यावर!

ओबीसी आरक्षणावर शनिवारी, २६ जून रोजी काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात तर भाजप राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे. 

71

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आता या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला असून, हे दोन्ही पक्ष एकाच दिवशी म्हणजे शनिवारी, २६ जून रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. भाजपचे आंदोलन हे राज्य सरकारविरोधात असणार आहे, तर काँग्रेसचे आंदोलन हे केंद्र सरकार विरोधात असणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला फायदा होणार की हे दोन्ही पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधणार असा सवाल मात्र आता सर्वसामान्य उपस्थित करू लागले आहेत.

मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार, २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार २६ जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील, असे नाना पटोले म्हणाले.

(हेही वाचा : ‘तो’ मौलवी निघाला अब्जाधीश! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा!  )

भाजपचे चक्का जाम आंदोलन 

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली. सरकारच्या मंत्र्यांनी देखील ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर निवडणुका होणार नाही, असे म्हटले होते. आता त्या मंत्र्यांच्या तोंडाला टाळे लागले का, असा संतप्त सवाल करत 100 टक्के दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारमधील मंत्री करत आहेत, फक्त दिशाभूल करायची आणि प्रत्येक गोष्ट केंद्राकडे ढकलायची, असे या सरकारचे सुरू आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आघाडी सरकारविरोधात आगपाखड केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.