सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे? राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल

101

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याआधी ठाणे, मुंबईच्या मराठी माणसांचा अपमान केला होता. सावित्रीबाईंबाबतही असेच बोलले होते, तेव्हा आपण ‘जाऊदे, होते कधी कधी असे’, म्हणून सोडून दिले होते. आता महाराजांचा अपमान केला आहे. सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे हे पाहिले पाहिजे, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र बंद करू

राज्यपालांनी शिवरायांचा अवमान केला, त्यानंतर सर्वांकडून गुळमुळीच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपाकडून मिळमिळीत प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही टपलीत मारावे असे राजकारण सुरु आहे. वेळ आली तर ‘महाराष्ट्र बंद’ करू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

(हेही वाचा भगतसिंह कोश्यारींना तत्काळ पदावरुन दूर करा; उदयनराजेंनी केली पंतप्रधानांकडे तक्रार)

वृद्धाश्रमात पाठवण्याची वेळ 

ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमले जातेय का? राज्यपाल हे नि:पक्षपाती असावेत, राज्यात काही पेच झाला तर तो केंद्रात सोडवावे, अशी भूमिका असायला हवी, परंतु कोश्यारी तसे वागत नाही. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची यांची हिंमत झाली. त्यामुळे त्यांना राज्यपाल बोलण्याचे मी सोडले आहे. या सॅम्पलला आता वृद्धाश्रमात पाठविण्याची वेळ आली आहे, असेही ठाकरे म्हणाले.

राज्यपालांना घालविण्याची वेळ आली 

ईडी सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही माहित नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. ते पंतप्रधानांना मी सांगितले असे म्हणतात, ते काही करू शकत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले. संभाजी राजे बोलत आहेत, उदयनराजे बोलत आहेत, आता राज्यपालांना घालविण्य़ाची वेळ आली आहे. महाराष्ट्र द्रोह्याला इंगा दाखविलाच पाहिजे. मी पक्ष बाजुला ठेवून आवाहन करतोय, भाजपाचे लोक असतील तरी त्यांनी यावे, केंद्राला सुद्धा सांगतोय चाळे बास झाले. स्लीप ऑफ टंग एकदा होईल, सारखी सारखी होऊ शकत नाही. नाहीतर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतील याचा नेम नाही, असेही ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.