मुंबईचा लचका तोडण्याचा भाजपाचा मनसुबा! उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल  

81
शिवसेनाप्रमुख म्हणायचे देवळात घंटा बडवणारे नको तर अतिरेक्यांना मारणारे हिंदुत्व पाहिजे. गदा पेलली तरी पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत होतात, आम्ही तुम्हाला सोडून दिले, ते गदाधारी होते, तुमच्या सारख्या गाढवाने लाथ मारायच्या आधीच आम्ही त्यांना लाथ मारली, आता बसा बोंबलत. देशात हिंदुत्वाचे रक्षक भाजपा असे दाखवण्यात येत आहे, मग आम्ही कोण आहेत? कुणाची हिंदुत्वावर घाला घालायची बिशाद आहे बघतोच. १ मे रोजी भाजपाची सभा होती. त्यात ते म्हणाले की, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमची सतरोशा साठ पिढ्या आल्या तरी ते होऊ देणार नाही. १०७ जणांचे हौतात्मे पत्करून ही मुंबई मिळवली आहे. आता या बीकेसीमध्ये बुलेट ट्रेन येणार आहे. मुंबई-अहमदाबाद अशी ही ट्रेन असणार आहे. हा मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव आहे. तुमची मातृसंस्था संघ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संघ होता, तरी स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही त्या लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात जनसंघ म्हणून होतात, तेव्हा माझे आजोबा होते, संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. त्या समितीतून पहिले जनसंघ फुटला होता. जागा वाटपावरून ते फुटले. मुंबईचा लचका तोडण्याचा त्यांचा मनसुबा आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राहुल भट्ट काश्मीर फाईलचा दुसरे पान आहे का?

आमची २५ वर्षे युतीत सडली, पण हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यावर त्यांचा विकृत चेहरा आम्हाला दिसत आहे. इतक्या वाईट पद्धतीने आमच्या अंगावर येत आहेत. दैनिक सामना मध्ये असा एक लेख दाखवा, ज्यात पंतप्रधानांवर टीका केली आहे. १९४७ साली वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते, कारण ७ पैशाने इंधन वाढले होते, मग आता तो भाजप कुठे गेला आहे, जर तेव्हाची बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, तर तेव्हाची वाजपेयी यांची भाजप तरी आहे का? प्रबोधिनी येथे सध्या चिंतन-कुंथन सुरु असते, प्रमोद महाजन होते तेव्हा तिथे जे संस्कार दिले ते आज कुठे भाजपचे दिसत नाही. कुठे गेले आज कुणावर जबाबदारी आहे? खोटे नाटे बोलायचे शिकवतात का? राहुल भट्ट वर कार्यालयात घुसून ठार केले, आता तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणायची का? काश्मीर फाईलचे दुसरे पान आहे का?, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

भाजपाच्या सभेत भगव्या टोप्या घातल्या होत्या, हिंदुत्व जर भगवी टोपी घालून दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी भगवी का? आम्ही हिंदू आहेत का, हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. मनोरुग्ण आहेत हे लोक, दुर्दशेकडे आपण जात आहोत. शरद पवार यांच्यावर कुणी तरी टीका केली, त्या बाईच्या घरात आई-वडील आहेत का, संस्कार वगैरे आहेत का, सुसंसस्कृतपणा जपायला पाहिजे, या चित्र-विचित्र प्रकार टाळले पाहिजे हे काम आपल्याला करायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दाऊद जर म्हणाला मी भाजपात येतो तर त्यालाही ते मंत्री बनवतील, ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती आणि तुमची बाबरी पडली तेव्हा तुमच्या शेपट्या आतमध्ये गेल्या होत्या. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, तुमचे हिंदुत्व काय आहे हे सांगा. महाराष्ट्र सगळ्या बाबतीत पुढे जात आहे, हे तुम्हाला बघवत नाही. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, बोंबलायचे नुसते, आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्द नाही, आम्ही कुणी तुमच्या कुटुंबाची निंदा नालस्ती केली नाही, केवळ सत्ता मिळत नाही म्हणून एकतर्फी प्रेम तुमचे सुरु आहे. म्हणून महाराष्ट्र विद्रुप करू नका. हा सगळा तमाशा बंद करा आणि महाराष्ट्र सुसंकृत करण्यासाठी एकत्र या, असे आवाहन करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

गलिच्छ राजकारण सोडून द्या!

राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्याला केंद्र परवानगी देत नाही, आमची मंदिरे पावसाळ्यात पाण्याखाली जातात, त्यांची देखभाल करायची आहे, त्याकडे लक्ष देत नाही पण तोच पुरातत्व विभाग औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करत आहे, त्यांना जाऊन विचारा. सगळे अडवून ठेवले आहे. कांजूरच्या जागेची अडवून ठेवली आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देत नाही. तिकडे जाऊन बोंबलत बसा, अडीच वर्षे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री म्हणून झाली, अनुभव नसताना सरकार सुरु आहे, मग खोटे गुन्हे लावले, ईडी मागे लावली, मग आम्ही अजिबात गप्प बसणार नाही. कायद्याचा दुरुपयोग करू नका, समोरासमोर येऊन लढा. गलिच्छ राजकारण सोडून द्या, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.