मी सध्या आजारपणामुळे घरी आहे, घराबाहेर पडू शकत नाही, पण म्हणून मी घराबाहेर पडण्यास असमर्थ आहे, असे नाही, मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, तलवार जरी माझ्या हातात नसली तरी ती कशी फिरवायची, ती कशी चालवायची हे मला चांगलेच माहित आहे, योग्य वेळी ती मी चालवेन, अशा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईत माझगाव येथील महाराणा प्रताप चौक येथे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी दृक्श्राव्य पद्धतीने केले आणि मनोगत व्यक्त केले. यावेळी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल उपस्थित होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
वीर महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापन केला आहे. आज शिवसेनाप्रमुख यांचा जन्मदिवस आहे. हा योगायोग आहे महाराणा प्रताप यांनी त्या काळात ज्या चेतना जागृत केल्या, तेच काम शिवसेनाप्रमुखांनी केले आहे. मी जरी घरात असलो, तरी बाहेर पडायला असमर्थ आहे असे नाही. हातात तालावर नसली तरी ती कशी गाजवायची हे मला ठाऊक आहे, तशी मी या आधीही फिरवलेली आहेच. प्रेरणा कुणापासून घ्यायची हे महत्वाचे आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी वीर पराक्रमी पुरुषांचे पुतळे बसवून तुम्ही मोठे काम केले. महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक हा जखमी असतानाही चेतक याने महाराणा प्रताप यांना २२ फुटांच्या नाल्यावरून उडी मारून वाचवले आणि प्राण सोडले. इतका तो निष्ठावंत होता. नुसता पुतळा बांधून थांबू नका, हा आदर्श असाच पुढे न्या, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
(हेही वाचा बाळासाहेब असते तर, मोदी, शहांवर…! काय म्हणाले संजय राऊत?)
Join Our WhatsApp Community