Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा आव्हाडांवर विश्वास; विचारेंवर अविश्वास

124

मुंब्य्रातील शिवसेना शाखेवर कारवाई केल्यानंतर या शाखेची पाहणी करण्यास गेलेल्या उबाठा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंब्य्रात शक्तीप्रदर्शन केले. परंतु त्यांना शाखेपर्यंत पोहोचताच आले नाही. विशेष म्हणजे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाणेकर तगडे आहेत, असा दावा उध्दव ठाकरे यांनी केला असला तरी ठाण्याचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहेत ते उबाठा शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांचा सहभाग कुठेच दिसला नाही. मुंब्य्रात जावून उध्दव ठाकरेंना पोलिसांनी रोखल्यानंतर प्रत्यक्षात राजन विचारे आणि केदार दिघे हे चार पावले मागेच राहिल्याचे दिसून आल्याने या नेत्यांवरच उबाठा शिवसेनेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.

उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आव्हाडांची शक्ती पणाला

मुंब्य्रातील शिवसेना शाखा तोडून त्याठिकाणी कंटेनर ठेवण्यात आला. या शाखेवर शिवसेनेने दावा ठोकल्याने शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, अजय चौधरी, सुनील शिंदे यांच्यासह मुंब्य्रातील तोडलेल्या शाखेची पाहणी करण्यासाठी शनिवारी गेले होते. यावेळी ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले पक्षाचे नेते राजन विचारे आणि जिल्हाध्यक्ष केदार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आव्हाड यांनी सर्व शक्ती पणाला लावून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती. मात्र, या ठिकाणी आपली शाखा कायम राखण्यात राजन विचारे आणि दिघे हे कमी पडलेले असतानाच ते या पाहणी दरम्यान कुठेच उध्दव ठाकरे यांच्या आसपास दिसून आले नाहीत.

(हेही वाचा Shivsena : उद्धव ठाकरे ‘त्या’ शाखेपर्यंत पोहोचलेच नाहीत; कारण…)

विचारे आणि दिघे चार हात लांब

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीचा ताफा अडवल्यानंतर त्याठिकाणी अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर ही मंडळी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना दिसली. पण यावेळी ठाण्यातील सुत्रे हाताळणारे विचारे हे चार पावले लांबच उभे होते किंबहुंना त्यांना अधिक महत्व पक्षाने दिले नाही. त्यानंतर बॅरेकेट्स लावलेल्या ठिकाणापर्यंत उध्दव ठाकरे गेलेले असताना तिथेही विचारे त्यांच्यासोबत नव्हते. त्यावेळी पक्षाचे मोठे नेतेच सोबत होते. त्यामुळे ठाणे- मुंब्रा येथील प्रश्नी स्थानिक नेत्यांनाच सोबत न घेण्याचा प्रकार ठाणेकरांना रुचला नसून मुंब्रा येथील मुसलमानच अधिक असल्याने आव्हाड यांना पक्षाने मोठे महत्व देतानाच विचारे आणि दिघे यांना याच्या नियोजनापासून चार हात लांब ठेवल्याचेही दिसून आले.

उबाठा शिवसेनेतील शिवसैनिक नाराज झाले

शिवसेना पक्षात ठाण्यातूनच मोठी फुट पडल्यामुळे ठाण्यातील नेत्यांना मोठे न करण्याचा पक्षाने निर्धार केला असून तेथील पोलिसांशी ठाण्यातील नेत्यांचे चांगले संबंध असताना त्यांना सोबत घेऊन चर्चा करण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांनाच सोबत घेऊन उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चर्चा करत माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याने उबाठा शिवसेनेतील शिवसैनिक नाराज झाले आहेत. मुळात ठाणे, मुंब्रा येथे येवूनही त्यांनी आपल्या नेत्यांना विचारले नाही तसेच पत्रकार परिषदेत आव्हाड यांना उजव्या बाजुला बसवून विचारे यांना डाव्या बाजुला दुरच्या जागी बसवल्यानेही ठाणेकर उध्दव ठाकरेंवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.