भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी सावरकर, लाभ शिवसेना-भाजपला; श्रेय राहुल गांधींना!

90

सध्या सोशल मीडिया आणि मुख्य माध्यमांमधील बातम्यांचा आढावा घेतला तर, हे शीर्षक समर्पक ठरेल. Centre stage सावरकर, advantage शिवसेना-भाजप, पण credit राहुल गांधींना… सध्याच्या बातम्यांच्या केंद्रस्थानी सावरकर आहेत. त्याचा लाभ शिवसेना-भाजपला होतोय, पण त्याचे सगळे ‘श्रेय’ राहुल गांधींना आहे.

राहुल गांधींनी आपली खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, आपण सावरकर नाही. गांधी आहोत आणि गांधी कधी माफी मागत नाही, असे एकच वाक्य उच्चारले. त्यांची बाकीची सगळी पत्रकार परिषद मोदी – अदानी यांच्या भोवती केंद्रित होती. पण राहुल गांधी आणि सावरकर यांचे जे राजकीय षडाष्टक आहे, त्यावरच माध्यमांनी लक्ष केंद्रित केले आणि आज दिवसभराच्या बातम्यांमध्ये सावरकर केंद्रस्थानी राहिले.

केंद्रात भाजप पूर्ण बहुमतात येऊन ही दुसरी टर्म आहे, तरी देखील सावरकर या मुद्द्याला भाजपला केंद्रस्थानी आणता आले नव्हते. ते केंद्रस्थान राहुल गांधींच्या अवास्तव आणि नकारात्मक टीकेमुळे सावरकरांना मिळाले आहे.

सावरकर – गांधी दोन ध्रुव

सावरकर आणि गांधी म्हणजे महात्मा गांधी हे भारतीय राजकारणातले दोन ध्रुव आहेत. अनेक विषयांवर त्यांचे गंभीर मतभेद अखेरपर्यंत राहिले होते. पण म्हणून त्यांनी एकमेकांचा अपमान केल्याची उदाहरणे सापडत नाहीत. सावरकरांचे कथित माफीनामे तर महात्मा गांधींच्या हयातीत लिहिले गेले होते. तरी देखील महात्मा गांधींनी त्यांचा उल्लेख कधीही राहुल गांधी यांच्यासारखा “माफीवीर” असा केला नव्हता. उलट सावरकर हे शूर आहेत हीच महात्मा गांधींची धारणा अखेरपर्यंत होती. दोन्ही नेत्यांना आपल्यातले गंभीर मतभेद मान्य होते. मात्र, राहुल गांधी आणि त्यांच्या भोवती असलेल्यांना हे सभ्य सुसंस्कृत मतभेद मान्य नाहीत. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या कथित माफीनाम्याचा विषय वारंवार काढला आणि आता तो भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला आहे. याचे नकारात्मक क्रेडिट राहुल गांधींना आहे!! जे भाजप आणि संघ परिवाराला सकारात्मकतेने कधी जमले नव्हते, ते राहुल गांधी आणि त्यांच्या कोटरीने नकारात्मक पद्धतीने करून दाखवले आहे आणि माध्यमांनी देखील “बॅड न्यूज इज न्यूज” या निकषावर सावरकर हा मुद्दा सेंटर स्टेजवर आणून ठेवला आहे!!

सावरकर गौरव यात्रा

शिवसेना – भाजप महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा 288 मतदार संघात काढणार आहे. आत्तापर्यंत काढण्यात आलेल्या यात्रांपैकी ही सर्वात मोठी यात्रा असणे अपेक्षित आहे. दिल्लीत भाजपचे खासदार सावरकरांच्या सन्मानासाठी संसदेत आणि संसदेबाहेरही एकवटले आहेत. इतकेच नाही, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरच्या बैठकीवर बहिष्कार घालणे या राजकीय परिस्थितीमुळेच भाग पडले आहे.

राहुल गांधी अंतिमतः काँग्रेसला घातक

अर्थातच राहुल गांधींचा कुठलाही प्रचाराचा मुद्दा हा अंतिमतः काँग्रेसला घातक आणि भाजपला अनुकूल ठरतो हा गेल्या 10 वर्षांमधला राजकीय अनुभव आहे. तोच इथे लागू आहे. राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या रणनीतीकारांनी राहुल गांधींना हजारदा सांगितले, की मोदींना टार्गेट करू नका. त्याचा मोदींना फायदा होतो आणि काँग्रेसला तोटा होतो, तरी देखील राहुल गांधी त्यांचे न ऐकता मोदींनाच टार्गेट करत राहतात आणि स्वतःच्या राजकीय कर्तृत्वातून आणि वक्तृत्वातून मोदींना लाभ पुरवठा करत राहतात, तसेच आता सावरकरांच्या बाबतीत झाले आहे. याची सुरुवात स्वतःच राहुल गांधींनी भर लोकसभेत, “गांधी हमारे, सावरकर तुम्हारे” असे म्हणून केली होती. काँग्रेस मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेतले त्यांचे वक्तव्य अनेक वक्तव्यांपैकी एक वक्तव्य आहे. पण तेच पुन्हा एकदा सावरकरांना केंद्रस्थानी आणायला कारणीभूत ठरले आहे.

द मोस्ट रेलेव्हन्ट लीडर

सावरकर हे नेहमीच लोकप्रिय नेते होते. पण निवडणुकीच्या निकषावर त्यांना त्या लोकप्रियतेच्या तुलनेत कधीच यश मिळाले नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 55 वर्षांनी ते भारतीय राजकारणाच्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सावरकर या अर्थाने the most politically relevant leader ठरले आहेत. पण याचे credit नकारात्मक का होईना, पण ते राहुल गांधींना जात आहे!!

– विनायक ढेरे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.