विज्ञानवादी वीर सावरकर…

205
एक कुशल राजकारणी, कुसुम कोमल कवी, इतिहासकार, भाषाशुद्धीकार, समाजसुधारक, क्रांतिकारक अशा अनेक राष्ट्रोद्धारक सदगुणांचा संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर उभी न करता ‘विज्ञानग्रंथाच्या’ प्रबळ पायावर उभी केली पाहिजे, असा आग्रह त्यांचा होता. मानवतावाद आणि राष्ट्रवादी विचारसरणी हा सावरकरांच्या विचारांचा गाभा असून राष्ट्राला हितकारक असे अनेक दूरदृष्टीपर लेखन सावरकरांनी केले. क्ष किरणे, विज्ञाननिष्ठ निबंध या पुस्तकातून त्यांच्या दृष्टिकोनाचा अंदाज आपल्याला येतो. सूर्याचे उपकार कुठवर वर्णावे! त्याचे तें दिव्य, हिरण्यमय, दैदीप्यमान तेजोमंडल पाहताच मनुष्याचे नेत्रच नव्हे, तर बुद्धिही दिपून जाते! (त्याच्या) त्या महनीय विभूतिमत्वाने आदर नि अत्यंत उपकारिकत्वाने कृतज्ञता यांनी भारुन जाऊन त्या वेदकालीन रसिक ऋषींनाच काय; पण आजच्या एखाद्या रखरखीत नास्तिकालाही (सूर्याला) वारंवार वंदिल्यावाचून राहवणार नाही!
हिंदू धर्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करताना सावरकर सांगतात –
‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय।
तसेच, ‘ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै’ किंवा ‘सत्यमेव जयतें’ वा ‘दीपज्योतिर्नमोस्तुतें’ असे म्हणणारा आपला धर्म विज्ञानाच्या विरोधात जातच नाही. तो विज्ञानाला पूरकच आहे. आपण त्या धर्माला समजून घेण्यात चुकतो.
फक्त गोपूजनच नव्हे तर गोपालनामार्फत गाईंचे संरक्षण व्हावे यासाठी सावरकर प्रयत्नशील दिसतात. ‘प्राचीन काळापासून गाय ही मनुष्याची आज युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झालेली आहे आणि शेतीच्या खालोखाल जिच्या दुध, दही, लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अत्युपयुक्त पशू- आम्हा मनुष्यास एखाद्या कुटूंबीयाइतके ममत्व वाटावे हे अगदी माणुसकीस धरूनच अशा त्या गाईचे रक्षण करणे, पालन करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर आपल्या हिंदुस्थानपुरते तरी एक राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ असे सावरकर सांगताना दिसतात.

अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य 

मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘सर्व प्राण्यांत माणूस हा दुबळा प्राणी, पण यंत्रांनी त्याची शक्ती वाढविली आणि तो सर्व प्राण्यांत प्रबळ झाला.’ आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. याचमुळे राष्ट्रीय स्वरूपाच्या उत्सवात अग्रगणी असलेल्या गणेशाच्या पूजनाला बुद्धीवाद्याला देखील अडचण नसावी असे ते म्हणतात. एखाद्या उत्सवात सहभागी व्हायचे नाही हे बुद्धिवेड आहे असे सावरकर म्हणतात.

विज्ञानाने सृष्टीला दासासारखे राबवून घेता येते

विज्ञान कसे श्रेष्ठ आहे हे सांगताना ‘यज्ञाची कुळकथा’मध्ये ते म्हणतात, ‘वेदांपेक्षा विज्ञानाने हे सूर्य, अग्नी, प्रकाश, सोम कसे तत्काळ आणि बिनचूक माणसाळले जातात. या विज्ञानाने सृष्टीला दासासारखे राबवून घेता येते.’ ह्या विचारातून विज्ञानाचा सामर्थ्यप्रभाव ते पटवून देतात. आता अग्नीचा मनू संपून विद्युत-रेडियमचे मन्वंतर चालू आहे. त्यामुळे यज्ञाचे निरर्थकत्व पटवून देऊन, ‘यज्ञात भवति पर्जन्यो’ या धर्मसूत्राऐवजी, ‘विज्ञानदेवो पर्जन्यो’ हे विज्ञानसूत्र स्थापण्याचा ते आग्रह धरतात. हिंदु ध्वजावर त्यांनी निःश्रेयसाचे प्रतीक म्हणून कुंडलिनी आणली; पण आशयाने मात्र ती पूर्णतः बुद्धिवादी होती. ती प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली विज्ञाननिष्ठ गोष्ट होती. त्यामुळे भक्तांचेही समाधान झाले आणि राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रध्वज हे एक प्रतीक असते त्यामुळे तिचे स्वरूप राष्ट्र पोषक अशा विज्ञानाला दर्शवणारे असावे हा हेतू देखील साध्य झाला.

विज्ञाननिष्ठ क्रांतिकारकास विनम्र अभिवादन

‘युरोपीयनांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे! त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले! रशियाने तर बायबल फाडूनच टाकले! एकच धर्मग्रंथ असणाऱ्या लक्षावधी मुसलमानांवर, कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण करणारा रशियाच आज राज्य करीत आहे.’ या ठिकाणी आपला विचार पटवून देताना, देव- धर्मावर समाज व राष्ट्र उभे न करणाऱ्या रशिया, जपान या राष्ट्रांचे आणि युरोप खंडाचे दाखले ते देतात. प्लेगची परिस्थिती ज्यावेळेस सावरकर कुटुंबाने १८९७ साली प्रत्यक्ष अनुभवली. पशु बळी किंवा कर्मकांडाने आपत्ती साध्य होत नाही किंवा भगवतभक्ती करण्याने संकट मोचन होत नाही याबद्दल ते आग्रही होते… समस्या व तिचे अचूक विश्लेषण हा सावरकरांच्या बुद्धिवादाचा विशेष गुण आहे. अशा बुद्धिवादी व विज्ञाननिष्ठ क्रांतिकारकास विनम्र अभिवादन.
लेखक – मधुरा कुलकर्णी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.