‘राज्यात नेमकं चाललंय काय? …आता मुख्यमंत्रीही गायब’, चित्रा वाघ भडकल्या

88

सोमवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यावर जावून तेथील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सावरपाडा येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी जीवाची पर्वा न करता जीवघेणा प्रवास करून पाणी आणावे लागत होते. मात्र आता तिथे लोखंडी साकव बांधले असले, तरी तिथे पूल बांधण्याची गरज असून तो पूल बांधण्यात यावा अशी विनंती त्यांनी आदित्य ठाकरेंना केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला.

राज्य सरकारला संतप्त सवाल

वाघ पुढे म्हणाल्या की, राज्यात अपहरणाच्या घटना वाढतायत राज्यात 25 हजार महिला, मुली गायब आहेत महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि मुख्यमंत्रीही गायब आहेत. नाशकात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय? असा संतप्त सवालही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला उपस्थितीत केला आहे.

(हेही वाचा – सावरपाडा गाव: पाण्यासाठीची ‘जीव’घेणी वाट झाली सुसह्य)

जबाबदारी कुणाची?

खरशेत येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी 30 फूट खोल नदीवरुन जीवघेणी कसरत करावी लागत होती. तेथील नदीवर लोखंडी पूल बसवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी महिलांना दिलासा मिळाला आहे. पण शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज असून जिल्ह्यातील 50 टक्के आदिवासी बांधवाना खावटी योजनेचं अनुदान मिळालेली नाही. तर नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असून एकट्या नंदुरबार जिल्ह्यात 31 मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला आहे. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.