स्वातंत्र्यवीर सावरकरांची परराष्ट्रनीती!

127
आज आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून शाहत्तराव्या वर्षात वाटचाल करत आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा राजकारणात आणि समाजकारणात गुंतलेले होते, तो पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळात सुद्धा एखाद्या भविष्यवेत्त्या प्रमाणे सावरकरांची राष्ट्रभक्ती आणि मर्मग्राही बुद्धिमत्ता देशा पुढच्या आव्हानांचा सतत वेध घेत होती. येत्या काळात भारताचे एक स्वतंत्र आणि समर्थ परराष्ट्र धोरण कसे असावे ह्याबद्दल त्यांनी बरेच चिंतन केलेले होते. त्या चिंतनातूनच त्यांनी आपल्या सरकारला गंभीर इशारे दिलेले होते. पराराष्ट्राची आव्हाने आणि त्यातून उद्भवू शकणारी संकटे आणि विविध धोके ह्याचे समग्र मार्गदर्शन त्यांनी त्या काळच्या हिंदुस्थान सरकारपुढे ठेवले होते. त्या मार्गदर्शनाला सावरकरांच्या प्रदीर्घ चिंतनाची आणि विशेषतः त्यांच्या इतिहासाच्या सखोल अभ्यासाची जोड होती. त्या अभ्यासाच्या जोरावरच त्यांनी पाकिस्तान आणि मुख्य म्हणजे चीन, ह्या देशांकडून आपल्या देशावर होऊ शकणाऱ्या आक्रमणाबद्दल सरकारला जागृत करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता. परंतु त्या वेळेस आपले सरकार म्हणजेच पंडित नेहरू, हे पंचशील, आंतरराष्ट्रीय बंधुभाव इत्यादी दिवा स्वप्ने बघण्यात गुंगलेले होते आणि त्यामुळे ते अक्षम्य पद्धतीने बेसावध राहिले आणि त्यांनी सावरकर ह्यांच्या दूरदर्शी सूचनांचा पूर्णपणे त्याग केला.
सावरकर ह्यांचे प्रमुख सूत्र होते की, आंतरराष्ट्रीय संबंध हे नेहमीच दोन्ही देशांच्या परस्पर हितसंबंध सुरक्षित ठेवण्यावरच अवलंबून असतात. तसेच जग हे नेहमी सामर्थ्याचीच भाषा समजू शकते. दुर्बल देशांच्या केकटण्याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. त्याचमुळे भारत देशाने सर्वप्रथम समर्थ होण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अणुबॉम्बची निर्मिती भारताने सर्वात आधी केली पाहिजे, हे सावरकर सदैव ठामपणे म्हणत असत. दुर्दैवाने हे नेहरू ह्यांना कधीच समजले नाही. त्यामुळेच भारत अण्वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात सुरुवातीला चीनच्या पुढे होता. तरी देखील आपण अणुस्फोट करण्यात चीनच्या मागेच राहिलो. १९६२च्या युद्धात आपला चीनकडून झालेला पराभव हा सावरकरांना खूपच क्लेशदायी झाला. ते सारखे सांगत असत की, ‘कुठल्याही राष्ट्रासाठी त्याचे मित्र देश वा शत्रू देश हे कधीही कायमचे नसतात. कायम असा दोस्त किंवा शत्रू कधीच नसतो. कायम असतात ते राष्ट्रा राष्ट्रांसंबंधात त्या त्या राष्ट्रांचे हितसंबंध!

सावरकरांची तत्वे तंतोतंत पाळल्यामुळेच चांगले दिवस

पाकिस्तान हा देशच मुळी भारताशी असलेल्या पारंपरिक हिंदू-मुस्लिम शत्रुत्व भावनेतून निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या देशाशी आपली मैत्री हे एक मृगजळच असेल हे सावरकर नेहमीच मांडत असत. पण चीन हा एक विस्तारवादी देश आहे आणि त्याच्या पुढच्या चाली भारताला त्रासदायक ठरतील हा इशारा वारंवार देऊनसुद्धा नेहरू आपल्याच भ्रामक समजुतीत मश्गुल राहिले! ह्या भ्रमाची फार मोठी किंमत भारताला मोजावी लागलेली आहे! परंतु आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ह्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. सावरकरांची तत्वे तंतोतंत पाळल्यामुळेच आपल्याला हे चांगले दिवस दिसू लागले आहेत हे निश्चित! ह्यापुर्वी कॉँग्रेसी राजवटीत भारत हा कायम आपल्या बलाढ्य सहकारी देशांपुढे नमून वागताना आपण पहिले आहे. बहुतांश वेळी आपण सोव्हिएत रशियाचा मित्र देशांच्या यादीत अग्रक्रमाने होतो. त्याचप्रमाणे आपला पारंपरिक शत्रू पाकिस्तान हा सदैव अमेरिका आणि त्यांच्या युरोपीय मित्रदेशांच्या फळीत उभा राहिलेला होता. मात्र २०१४ साली मोदी सरकार राज्यावर आल्यानंतर ह्या परिस्थितीत फरक पडण्यास सुरुवात झाली.
परराष्ट्र धोरणात एक अतिशय मोलाचे तत्व असते की, ‘राष्ट्रा राष्ट्रांच्या परस्पर संबंधाविषयी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, रशिया हा आपला मित्र असला तरीही अमेरिका हे आपले शत्रूराष्ट्र खचितच नाही. ह्या नीतीचे एक अतिशय सुस्पष्ट दर्शन नुकतेच आपल्या रशियाच्या बद्दलच्या परराष्ट्र नीतीत दिसून आले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर आपले संबंध उत्तम आहेत! परंतु ज्या वेळी अमेरिकेने रशिया वर त्यांचे तेल आणि नैसर्गिक वायु विकण्यास बंदी घातली त्या वेळी मात्र मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितले की, ‘आम्हाला कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑईल अधिक प्रमाणात हवे आहे आणि असे तेल जर रशियाने आम्हाला स्वस्तात देऊ केले तर आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू, त्यासाठी युरोपियन देशांची किंवा अमेरिकेची परवानगी मागण्याची भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला अजिबात गरज नाही! हा एक समर्थ आणि सार्वभौम राष्ट्राचा उद्गार आहे! त्यामुळे आपल्या परराष्ट्र नीतीची भावी वाटचाल कशा प्रकारे होईल ह्याची एक चुणूक सर्व जगाला मिळाली!

भारताचे एक देश म्हणून महत्त्वाचे स्थान

मोदी आणि जयशंकर ह्यांच्या परराष्ट्र नीतीचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे, ते पूर्णपणे भारतकेंद्रीत आहेत. हा सुद्धा सावरकर प्रणीत ‘राष्ट्र प्रथम’ ह्या सूत्रचा अवलंब आहे! भारतासाठी जे जे उपयुक्त ठरेल ते ते आम्ही करणार, मग भले त्यात आपले पारंपरिक सहकारी देश नाराज झाले तरी आम्ही त्यांची फिकीर करणार नाही. ह्या एक सूत्राबरोबरच काही इतर महत्त्वाची नीती तत्वे देखील भारत पाळतो. त्यातील मुख्य म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम’! सर्व जग हे एका मानवतेच्या बंधनात बांधले गेले आहे! ह्याची प्रचिती कोविड काळात सर्व जगाला अत्यंत महत्त्वाचे रोगप्रतिबंधक लसीचे साठे पुरवून भारताने आणून दिली होती! त्या वेळेपासून भारताचे एक देश म्हणून महत्त्वाचे स्थान अधोरेखित झाले. आता तर भारत जी -२० ह्या एक आंतरराष्ट्रीय गटाचा अध्यक्ष झाला आहे व ह्या पदावरून ‘गरीब राष्ट्रांना सर्व तऱ्हेची मदत करण्यास जी-२० संघटना दमदार पाऊले उचलील’, असा विश्वास मोदी ह्यांनी व्यक्त केला आहे. भारत देश हा ह्या सर्व गरीब राष्ट्रांचा आवाज बुलंद करण्यात संपूर्ण मदत करील असे त्यांनी घोषित केले. पण त्याच वेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी भारत सर्व शक्तीनिशी संग्राम करून त्याचा नायनाट करील हा संदेश देखील अगदी स्पष्ट शब्दात आपण जगासमोर मांडलेला आहे!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.