…जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, “मी आणि माझे कुटुंब शिवसेना सोडायला तयार…”

80

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने शिवसेनेची झालेली सध्याची अवस्था पुन्हा पूर्ववत करण्यास उद्धव ठाकरेंसमोर आव्हान आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असून मुख्यमंत्री देखील असल्याने पक्षासह सरकार वाचवणं ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ४० ते ४५ आमदार शिंदेंनी फोडल्यानंतर न डगमगता बुधवारी उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला.

उद्धव ठाकरेंचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल?

यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना सांगितले की, समोर यावे आणि सांगावे मी मुख्यमंत्री नको, मी राजीनामा द्यायला तयार आहे. दरम्यान, ३० वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मी शिवसेना सोडालया तयार असल्याचे होते. यावरून वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत राजकीय संदेश दिल्याचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडला वर्षा बंगला)

काय म्हणाले होते बाळासाहेब?

30 वर्षांपूर्वी 1992 साली आपण शिवसेना सोडत असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. ज्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलं, पक्षात प्राण फुंकला तोच पक्ष सोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तयार झाले होते. हा सर्व किस्सा 1992 सालच्या सामनामधील एका लेखात देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?)

त्यावेळी शिवसेनेचे एक जुने नेते माधव देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे पक्षाच्या कारभारात खूप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र या आरोपांनी बाळासाहेब ठाकरे नाराज होऊन ते दुखावले गेले होते. त्यानंतर त्यांनी सामना वृत्तपत्रामधून मी आणि माझे कुटुंब शिवसेना सोडायला तयार असल्याचे जाहीर केले. मात्र बाळासाहेबांच्या या भुमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शांत करत म्हटले होते की, मला एका तरी शिवसैनिकाने सांगावे की मी तुमच्यामुळे पक्ष सोडला. त्यानंतर मी पक्षप्रमुख पदाचा त्याग करेल. माझे कुटुंब देखील शिवसेनेमध्ये राहणार नाही, असे म्हटले होते.

उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?

दरम्यान, अशाच प्रकारे उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना आव्हान केले की, तुम्ही समोर या, तुम्ही जर मला सांगितले की मी मुख्यमंत्री म्हणून नकोय तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. इतकेच काय तर मी पक्षप्रमुख पद देखील सोडण्यास देखील तयार आहे. त्यामुळे आता हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे की उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? उद्धव ठाकरेंच्या भावनिक आव्हानाचा शिवसैनिकांवर काय परिणाम होतो?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.