संजय राऊत यांना नवाब मलिकांना भेटायची घाई?

95

काही दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात वाक्‌युद्ध सुरु आहे. नारायण राणे पूर्वीपासूनच आक्रमक नेते मानले जातात. नारायण राणे सतत ठाकरे गटाला डिवचत असतात. मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमधील वाद गाजला होता. आता संजय राऊत यांच्यावर राणेंनी टीका केल्यानंतर संजय राऊत फारच आक्रमक झाल्याचे दिसले. त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख केला.

राऊत आता पूर्वीप्रमाणे बोलू लागले आहेत

“कोण आहात तुम्ही? डरपोक माणूस, आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? मोठा भाईगिरी दाखवतो, आम्हाला. या दाखवतो” असं आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं आहे. नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांची एक दहशत होती. नारायण राणे हे खूप पूर्वीपासून शिवसेनेत आहेत आणि शिवसेना घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु आता संजय राऊतांची बदललेली भाषा आश्चर्यकारक आहे. संजय राऊत हल्लीच १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहून आले आहे. अनिल देशमुख हे वय आणि आरोग्याच्या कारणामुळे बाहेर आले आहेत. नवाब मलिक अजूनही तुरुंगात आहेत. संजय राऊत बाहेर आल्यानंतर पुन्हा बोलायला सुरु करतील की शांत राहतील याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरचं पहिलं भाषण राऊतांनी केलं ते भान राखून. परंतु राऊत आता पूर्वीप्रमाणे बोलू लागले आहेत.

(हेही वाचा महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात सरकारची छाप; निवडणुकीचा ध्यास)

संजय राऊत आता बिथरले आहेत

त्यांनी नारायण राणेंना एकटा येण्याचं आव्हान दिल्यानंतर नारायण राणेंनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे. “तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो” असं म्हणत त्यांनी थेट लढाईची भाषा केली आहे. आता यावर संजय राऊत खरोखर मैदानात येतात की माघार घेतात हे पाहावे लागणार आहे. परंतु संजय राऊत आता बिथरले आहेत, चिडले आहेत. याचं खरं कारण काय आहे?

संजय राऊतांवर संकट आल्यावर ते प्रचंड चिडतात

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी पालापाचोळा, चिल्लर, कचरा असा उल्लेख केला. संजय राऊत यांनी कोणतीच निवडणूक स्वतःच्या बळावर जिंकली नसतानाही त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून आणून दाखवण्याची भाषा केली. त्यांची चिडचिड पाहता असं वाटत आहे की काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय काय बोलायचे हे नारायण राणे ठाकरेंना सांगणार आहेत असं राणेंनी म्हटलं होतं व पत्रकरांनी तो प्रश्न विचारला असता राऊतांचा चेहरा पाहण्यासारखा होता. संजय राऊतांचं ठाकरे गटातील अस्तित्वही धोक्यात येणार आहे का? एखादे प्रकरण राऊतांवर शेकणार आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. कारण संजय राऊतांवर संकट आल्यावर ते प्रचंड चिडतात आणि आपण कसे लढवय्ये आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहण्याची घाई लागली आहे का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.