मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी सुचवला ‘हा’ पर्यायी शब्द; चर्चांना उधाण!

114

भाजप सरकारकडून आजपर्यंत अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यावरून वेळोवेळी विरोधी पक्षाकडून टीका देखील होतांना दिसली. अशातच राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावानुसार आता विधवा महिलांचा उल्लेख ‘गंगा भागीरथी’ म्हणजेच गं.भा असा केला जावा. त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयातील प्रधान सचिव यांना पत्र लिहून या प्रस्तावाची मागणी केली आहे. मात्र त्यांचा या प्रस्तावाला काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला प्रखर विरोध दर्शवला आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी परखड शब्दांमध्ये या प्रस्तावावर टीका केली आहे. “फक्त नाव बदलून परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी त्या व्यक्तीच्या समस्या मुळापासून जाणून घेणे गरजेचे आहे. अपंगांना दिव्यांग म्हणून किंवा दलितांना हरिजन म्हणून त्यांच्या वेदना कमी होत नाहीत. त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीच बदल होत नाही. त्यामुळे विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी म्हणणे हे फार चुकीचे आणि हास्यास्पद आहे.”

तर दुसरीकडे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विचारांनुसार अपंगांना दिव्यांग संबोधल्यामुळे त्यांचे समाजातील महत्व वाढते. त्या सगळ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. म्हणूनच यापुढे विधवा महिलांचा ‘गंगा भागीरथी असा उल्लेख केल्याने त्यांचे समाजातील स्थान वाढेल.

(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसारखा प्रयोग राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर; संजय राऊतांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.