पुन्हा होणार का पहाटेचे सरकार?

119

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटे पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमानंतर राज्यातील राजकारणात कधीही काहीही होऊ शकत, याची जणी साक्षच मिळाली होती. या शपथविधीनंतर भल्याभल्यांची झोप उडाली. मात्र पु्न्हा एकदा याची पुनरावृत्ती झाली तर..आणि तेही तेच रती महारथीसोबत…आश्चर्य वाटत असेल ना? पण राज्याच्या राजकाराणात पुन्हा एकदा असाच पहाटे-पहाटेच्या शपथविधीचा कार्यक्रम करण्यासाठी हालचाली सुरु असून, यावेळी फक्त मोहिम फत्ते व्हावी यासाठी घाईघाईत शपथविधी न करता ज्या चुका मागच्यावेळी झाल्या त्या पुन्हा होऊ नये याची खबरदारी देखील घेतली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने देखील राज्यात पुन्हा राजकीय भुकंप झाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर हिंदुस्थान पोस्ट सोबत बोलताना दिली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पडणारी का भारी

शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्याने सध्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी खूप असून, त्याचे पडसाद भविष्यात पक्षामध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर आज शिवसेनेचा आमदार असो वा मंत्री कुणीच सत्तेमध्ये खूश नसल्याचे देखील या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने हिंदुस्थान पोस्टशी खासगीत बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेतील काही माजी मंत्री देखील सध्या अडगळीत पडल्याचे या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

शिवसेनेतील नाराज माजीमंत्री 

SHIVSENA1

राज्यात भाजपा-शिवसेनेच्या काळामध्ये मंत्री असलेले ते शिवसेनेचे नेते सध्या प्रचंड नाराज असून, ते देखील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. या नाराजांमध्ये माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, माजी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री दिपक सावत तसेच कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे नाराज आमदारही दादांच्या संपर्कात

निधी वाटपाबाबत सध्या महाविकास आघाडीचे आमदार प्रचंड नाराज असून, काँग्रसचे काही नाराज आमदार तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती एका आमदाराने दिली. जी कामे काँग्रेसच्या मंत्र्यांकडून होत नाहीत ती अजित ‘दादां’च्या कार्यालयात तात्काळ होतात असे देखील काँग्रेसच्या या नाराज आमदाराने यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गौरंट्याल यांनी माझ्यासारख्या ११ आमदारांच्या ताब्यात असलेल्या पालिकांना पैसे मिळत नसल्याचे सांगत नाराजी देखील व्यक्त केली होती.

बिहार निवडणुकीनंतर हालचाली?

दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पहाटे-पहाटेचा शपथविधी संभव आहे का आणि त्यासाठी भाजपाची हालाचाल सुरु आहे का? याबाबत भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याला विचारले असता त्यांनी सध्या तरी भाजपा बिहार निवडणुका आणि राज्यातील कोरोना परिस्थिती यावर लक्ष केंद्रीत करत असून, बिहार निवडणुका झाल्या की राज्यातील राजकीय परिस्थितीवर बघता येईल असे सांगत हे सरकार स्वत:च्या कर्माने पडेल असे सांगत यावेळी पहाटे शपथविधीऐवजी सगळ्यांच्या समोर शपथविधी होईल असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.