‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’चे ८४ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२३ आधी सुरू होणार

85

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती, या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून, याभागाचा सूनियोजितपणे विकास करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.

( हेही वाचा : चांदणी चौकातील जुना पूल वाहतुकीस बंद; १८ सप्टेंबरला १० सेकंदात होणार जमीनदोस्त )

शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतुवर जावून कामाचा आढावा घेतला. एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली. शिवडी येथील प्रकल्प कार्यालयासही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा होणार असून, प्रवासवेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प आहे. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची देखील काळजी घेण्यात आली असून, गेल्या वर्षी पेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

पूर्व मुक्त मार्गाशी जोडणार

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई-वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

या प्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे. ३ पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.