एसी लोकलचे २२ हजार फुकटे प्रवासी

95

एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी मे – २०२२ मध्ये या गाड्यांचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. यानंतर मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आणि एसी लोकल प्रवासी संख्याही कालांतराने वाढली. परंतु आता लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल २२ हजार ३०० विनातिकीट प्रवाशांना रेल्वेने दंड आकारला आहे. ऑक्टोबरमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या सर्वाधिक ६ हजार ३४८ प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

( हेही वाचा : मुंबई लोकल का धावत आहेत विलंबाने? हे आहे कारण…)

विनातिकीट प्रवाशांची धरपकड 

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज लोकलच्या ७९ फेऱ्या होतात. अनेक प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकीट नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून सुद्धा बिनधास्त एसी लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळले आहे. एसी लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत याचाच गैरफायदा घेऊन प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत. विनातिकीट प्रवाशांकडून किमान २५० रुपये दंड आणि प्रवास भाडे वसूल करण्यात येते.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलमधून एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणऱ्या २२ हजार ३०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिलच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत तिप्पटीने वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.