आता रत्नागिरीतूनही उडणार विमान!

133

रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकासकामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

रत्नागिरी विमानतळाच्या विकासाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोकणातील पर्यटन आणि उद्योग-व्यवसाय वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक आहे. तेथून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांसाठीचे सुनियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरू होणारा हा विमानतळ कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जण ठार!)

भूसंपादनाचे काम सुरू

रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले की, पर्यटन व उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ महत्त्वाचा आहे. त्याचा विस्तार आणि विकास यासाठी नियोजन केले आहे. नुकतीच या विमानतळ परिसराला भेट देऊन, तेथील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक अशी पाहणी केल्याचे तसेच स्थानिकांशी चर्चा केल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी रत्नागिरी विमानतळाचा विकास व विस्ताराच्या अनुषंगाने भूसंपादन, विस्तार कामे, विविध सुविधा तसेच आवश्यक निधी यांची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनीही विमानतळ परिसरातील प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली. बैठकीला सामान्य प्रशासन विमानचालन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, तटरक्षक दलाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.