
बंगळुरू (Bangalore) येथे ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून सोमवार, ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल यांनी तासाभराचा व्हिडीओ शूट केला. तसेच सुसाइड नोटही लिहिली आहे. यानंतर आता अतुलवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तीन कोटी आणि मुलाला भेटू देण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी पत्नीकडून केली गेली होती, असा आरोप अतुल सुभाष (Atul Subhash Suicide) यांच्या भावाने केला आहे.
(हेही वाचा – Talathi Fraud : तलाठी बनवण्याचे आश्वासन; सनदी अधिकाऱ्याचा १६ उमेदवारांना लाखोंचा गंडा)
प्रत्येक कायदा महिलेच्या बाजूने
विकास कुमार तक्रार दाखल करताना म्हणाले की, न्यायालयीन लढा सुरू झाल्यापासून माझा भाऊ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तू मर, अशी धमकी त्यांनी दिली होती. जेव्हापासून भावाच्या विरोधात कोणत्याही पुराव्याशिवाय न्यायालयीन खटले दाखल झाले तेव्हापासून तो अडचणीत होता. फक्त न्यायालयाच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी त्याने बंगळुरू ते जौनपूर असा तब्बल ४० वेळा प्रवास केला होता. भारतात प्रत्येक कायदा महिलेच्या बाजूने आहे. मी याविरोधात ठामपणे लढणार आहे. ज्यातून माझ्या भावाला न्याय मिळेल आणि समाजात एक स्पष्ट संदेश जाईल.
न्यायाधिशांनी घेतली पत्नीची बाजू
अतुल सुभाष यांच्या भावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल केला आहे. अतुल सुभाष हे मुळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ साली सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या निकिता यांच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे झाले होते. सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होती. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच ८१ मिनिटांचा व्हिडीओही तयार केला. तसेच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधिशांनी पत्नीची बाजू घेतल्याचाही आरोप अतुल सुभाष यांनी केला आहे. (Atul Subhash Suicide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community