Badlapur ची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस महानिरिक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, ॲड. उज्ज्वल निकम-विशेष सरकारी वकील

139
Badlapur ची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बदलापूर (Badlapur) (जि.ठाणे) येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठित करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

(हेही वाचा – Badlapur प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क आयोगाची गंभीर दखल; चौकशीसाठी पथक दाखल होणार)

नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेअंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. पोलिस संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि, कुठे काही विलंब असेल, तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. (Badlapur)

(हेही वाचा – Badlapur School Case : अखेर सहा तासांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना लाठीचार्ज करून पांगवले)

अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बदलापूरच्या (Badlapur) घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (Badlapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.