अचानक मृत्यू झाल्यास ‘या’ सरकारी विमा योजनांमार्फत मिळू शकतो लाभ!

या योजनांचा लाभ घेत असलेल्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत मिळू शकते.

189

तुमचं ज्या बॅंकेत अकाऊंट आहे, त्या बॅंकेतील कर्मचा-यांनी तुम्हाला दोन फॉर्म दिले असतील आणि जर ते तुम्ही भरले असतील तर त्याची आठवण करुन देण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. या कठीण काळात ही माहिती तुमच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी उपयोगी ठरू शकते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या दोन विमा योजना केंद्र सरकारकडून 2015 पासून सुरू करण्यात आल्या. या योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

काय आहेत योजना?

या दोन योजनांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या बॅंक अकाऊंटमधून एक ठराविक रक्कम वजा होत असते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी 330 रुपये आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेसाठी 12 रुपये अशाप्रकारे 342 रुपये रक्कम दरवर्षी अकाऊंटमधून वजा होत असेल, तर ती प्रत्येक व्यक्ती या योजनांसाठी लाभार्थी आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेत असलेल्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत मिळू शकते. त्यामुळे आपल्या परिचयाच्या व्यक्तीसोबत अशी घटना घडली असल्यास, त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देऊन नक्कीच त्यांना मदत करु शकता. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना 90 दिवसांच्या आत बॅंकेत त्यासाठी दावा करायचा आहे.

(हेही वाचाः कोरोनासोबतच अफवांचीही पसरतेय लाट… असा पोखरतोय व्हायरल मेसेजचा ‘व्हायरस’! तथ्य आले समोर)

कसा मिळेल लाभ?

2015 साली केंद्र सरकारकडून सामान्यांना परवडेल अशी स्वस्त विमा योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. या योजनांमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार म्हणून आर्थिक मदत मिळू शकते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • ही विमा योजना एक टर्म प्लॅन आहे.
  • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तरच, त्याच्या कुटुंबालाच विमा कंपनीकडून पैसे दिले जातात.
  • या विमा योजनेसाठी दरवर्षी आपल्या अकाऊंटमधून 330 रुपये वजा झाल्यानंतर ही योजना रिन्यू होते.
  • दरवर्षी 31 मेपर्यंत ही पॉलिसी वैध समजली जाते.
  • 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून गणले जातात.

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना

  • 70 वर्षे वयापर्यंतच्या व्यक्ती या योजनेंतर्गत लाभार्थी आहेत.
  • या योजनेसाठी दरवर्षी आपल्या अकाऊंटमधून 12 रुपये वजा होतात.
  • 90 दिवसांच्या आत संबंधित बॅंकेतून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना लाभ मिळू शकतो.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो. कारण अशा दुःखद प्रसंगी लोक फार ताणावाखाली असतात. त्यामुळे या योजनांबाबत त्यांच्या लक्षात येत नाही. लोकांना याबाबत आठवण करुन देणे गरजेचे आहे. कारण कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक प्रश्नही उभा असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत या योजना त्यांच्यासाठी आधार बनू शकतात. या विमा योजनांची कुठलीही कागदपत्रं नाहीत. पासबूकवरील वजा झालेल्या रक्कमेची नोंद दाखवून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना याचा लाभ मिळू शकतो.

 

– जिमित शहा, गुंतवणूक सल्लागार

कोविडबाधित मृताच्या कुटुंबियांना लाभ मिळू शकतो?

कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णाच्या कुटुंबियांनाही या योजनेतून लाभ मिळू शकतो, अशा बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजनेतून अशाप्रकारचा कोणताही लाभ, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना मिळणार नसल्याचे, पीआयबी फॅक्ट चेक विंगने स्पष्ट केले आहे. तसेच, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत काही ठराविक अटींच्या आधारे अशा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना योजनेचा लाभ मिळू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.