भांडुप जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्वपदावर येण्यास सुरुवात! या भागांत होणार पाणीपुरवठा

68

भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होत असून, मुुंबईतील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरू करण्‍यात आला आहे.

युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने, जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. या कारणाने मुंबईतील बहुतांश भागांमध्ये रविवार १८ जुलै रोजी सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून, गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. संबंधित संयंत्राची पाहणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करुन उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरू करण्‍यात येत आहेत. उदंचन सुरू होताच भांडुप मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांनो आता पाणी उकळूनच प्या… महापालिकेचे आवाहन)

इथे होत आहे पाणीपुरवठा

  • एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा
  • के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूर्व परिसर
  • के/पश्चिम विभागातील यारी रोड
  • पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर
  • पी/दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर
  • आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल
  • आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर
  • शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशी पाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान
  • जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी
  • डी विभागात भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी
  • ए विभागात कुलाबा, कफ परेड

अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

(हेही वाचाः विहार तलावही भरला, मुंबईकरांना पाणी तुंबण्याची भीती)

भांडुुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होऊन पाणीपुरवठा पूर्वपदावर येत आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.