‘भारत’ सीरीजची वाहने देशभरात वैध; ‘हे’ आहेत फायदे

एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवास करणा-यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार

114

आंतरराज्यातील प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी वाहनधारकांसाठी बीएच (भारत) ही, नवी मालिका वाहननोंदणीसाठी घोषित केली आहे. या नव्या मालिकेनुसार वाहनांची नोंदणी सुरू झाली असून एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवास करणा-यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ही नवी मालिका विशिष्ट राज्यासाठी नसून, संपूर्ण देशभर प्रवासासाठी एक नोंदणी मालिका असणार आहे. महाराष्ट्रात बीएच मालिकेची नोंदणी सुरू झाली असून लोकांना आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणे सुकर झाले आहे. नवीन नोंदणी पद्धत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या नंबर प्लेटचे स्वरूप YY BH असणार आहे. असे परिवहन, गृह आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

असे आहेत फायदे…

१. नोंदणी प्रक्रिया डिजिटल असल्याने वाहनधारकांना सोयीचे होईल.
२. बीएच मालिकेद्वारे ज्या राज्यात सर्वप्रथम नोंदणी होईल तिथे कर भरावा लागेल, त्यानंतर परराज्यात स्थलांतर झाल्यास संबंधित राज्यात कर भरावा लागेल.
३. या नव्या सुविधेमुळे व्यक्तिगत मालकीच्या वाहनांना नव्या जागी कार्यान्वित व्हावयाची गरज भासल्यास, भारतातील कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मुक्तपणे स्थलांतरित होण्याची सोय झाली आहे.
४. वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी ही सुविधा मदत करेल.
५. ही सुविधा संरक्षण कर्मचारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल. तसेच चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

(हेही वाचा -कोविड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ‘कोव्हक्युअर’ ओरल स्प्रे)

मोटार वाहन अधिनियम, १९८८

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, एका राज्यातील नोंदणीकृत वाहन १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दुसर्‍या राज्यात ठेवल्यास त्याची नवीन नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया अतिशय किचकट होती. याविरोधात अनेक वाहन मालकांच्या तक्रारी येत होत्या, म्हणूनच बीएच ही नवी मालिका सुरू करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.